मुंबई – मनसेसकडून अक्षय तृतीयानिमित्त होणारे महाआरतीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना राज्यभरात होणारे महाआरतीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश दिलेत.
राज ठाकरे म्हणाले, “उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्याबाबतीत बोललो आहेच. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचं? हे मी उद्या माझ्या ट्विटरद्वारे आपल्यासमोर मांडेन. असे ट्विट राज ठाकरे यांनी केले आहे.
दरम्यान, उद्या अक्षयतृतीया आहे. त्यानिमित्ताने मनसेकडून राज्यभर महाआरतीचे कार्यक्रम करण्यात यावे, असे राज ठाकरे यांनी कालच्या औरंगाबदच्या सभेत सांगितले होते. त्यानुसार उद्या राज्यभर मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाआरती करणार होते. परंतु, राज यांच्या आवाहनानंतर आता मनसेचे महाआरतीचे कार्यक्रम होणार नाहीत. राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरून कार्यकर्त्यांना हे आवाहन केले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यासाठी दिलेला 3 मे च्या अल्टिमेटममध्ये देखील बदल केला आहे. 3 मे नंतर आता राज यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्यास 4 मे चा अल्टिमेटम दिला आहे.