आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास हंडा मोर्चा
शेवगाव – शहराला होणारा अनियमित पिण्याचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे वसुधा सावरकर व मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांना निवेदन देऊन आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास नगरपरिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या कित्येक दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. अनेक भागांत दहा ते बारा दिवसांनी पाणी सुटते. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. प्रभाग ७मधील महिलांनी सावरकर व रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली सविता भुजबळ, शैला बडधे, रूपाली क्षीरसागर, सिंधुबाई लोखंडे, बेबीताई मरकड, सुमन शेळके, मुक्ता पानखडे, शीतल तुपे, ज्योती नांगरे, अनिता गुणवंत, गीता नांगरे, मीरा भडके, मनीषा मरकड आदी महिलांच्या शिष्टमंडळांने मुख्याधिकारी सचिन राऊत यांची भेट घेऊन महिलांच्या पाण्याबाबतच्या व्यथा मांडल्या.
कित्येक कुटुंबांकडे इतके दिवस पाणीसाठा करण्याकरिता व्यवस्था नसल्याने नागरिक घरात टाक्या, बकेट, भांड्यांमध्ये पंधरा दिवस पाणी साठवून ठेवतात. साठलेल्या उघड्या पाण्यामध्ये डेंग्यूचे डास, अळ्या होत असून, नागरिकांना डेंग्यूची बाधा हाेत आहे.
नवीन पाणीपुरवठा योजनेचे सत्य नगरपरिषदेने नागरिकांसमोर मांडणे आवश्यक असून, टक्केवारीच्या व मलिद्याच्या खेळात शेवगावकरांना वेठीस धरण्याचे काम प्रशासनाने करू नये. सामान्य शेवगावकर अत्यंत सहनशील असून, त्यांच्या सहनशीलतेचा अंत प्रशासनाने पाहू नये. ही परिस्थिती निर्माण होण्यासाठी नगरपरिषद प्रशासन जबाबदार असल्याने येत्या आठ दिवसांत यात सुधारणा न केल्यास शहरातील महिलांच्या नेतृत्वाखाली कार्यालयासमोर हंडा मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या शिष्टमंडळातर्फे देण्यात आला.
Remarks :
शेवगाव पाणी प्रश्ना साठी मनसेही उतरली मैदानात :