रांची – झारखंडमध्ये राजकीय पेच उद्भवण्याची चिन्हे आहेत. त्यातून पुन्हा रिसॉर्ट राजकारणाचा खेळ रंगण्याची शक्यता बळावली आहे. सत्तारूढ आघाडीकडून आपल्या आमदारांना बिहार किंवा बंगालमध्ये हलवले जाण्याचे संकेत दिले जात आहेत.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर स्वत:च्या नावावर खाणकामाचे कंत्राट केल्याचा आरोप आहे. त्यावरून सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची शिफारस निवडणूक आयोगाने राज्यपाल रमेश बैस यांना केली आहे.
आमदार म्हणून अपात्र ठरवले गेल्यास सोरेन यांची खुर्ची धोक्यात येऊ शकते. त्यातून झारखंडमध्ये मोठा सत्तापेच उभा राहू शकतो. ती बाब ध्यानात घेऊन सोरेन यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सत्तारूढ आघाडीची बैठक झाली. त्यामध्ये आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी केली जाऊ शकते, या मुद्द्यावर चर्चा झाल्याचे समजते.
राज्य सरकारपुढील धोका टाळण्यासाठी आघाडीच्या आमदारांना इतर राज्यातील रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठेवण्याच्या पर्यायाचीही चाचपणी बैठकीत करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. झारखंडमध्ये झामुमो, कॉंग्रेस आणि राजदचा समावेश असलेल्या आघाडीची सत्ता आहे. (MLAs likely to be vandalized by BJP in Jharkhand; MLAs will be sent to other states)