नगर – पालकमंत्री राधाकृष्ण विखे व आ. प्रा. राम शिंदे यांच्यात वाद आहे; पण वादळ नाही, अशी कबुली देऊन या दोघांमधील वाद शमल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वीच नगरला जाहीर केले असताना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या चौंडी दौऱ्यापूर्वी त्यांना अकोले तालुक्यातील निळवंडे येथे आणून पालकमंत्र्यांनी आपले वर्चस्व सिद्ध करून पुन्हा एकदा आ. शिंदे यांना मात दिल्याची जिल्ह्यात चर्चा आहे.
चौंडीचा कार्यक्रम हा पूर्वनियोजित होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येणार असल्याचे नियोजित होते. मात्र, अचानक निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या चाचणीचा प्रारंभ कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री येणार असल्याचे चौंडीच्या कार्यक्रमापूर्वी दोन दिवस आधी जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर अवघ्या एका दिवसात लगेचच मुख्यमंत्री देखील निळवंडे धरणातील पाणी सोडण्याच्या चाचणी प्रारंभाला उपस्थित राहणार असल्याचे पालकमंत्री विखे यांनी जाहीर केले.
चौंडीच्या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निळवंडेच्या कार्यक्रमाला आणले. त्यानंतर चौंडीचा कार्यक्रम झाला. अशीच रणनीती राबविल्याची भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीपासून मंत्री विखे व आ. शिंदे यांच्यात वाद धुमसत आहे. आ. शिंदे यांनी थेट विखेंवर आरोप देखील केले. पण विखेंनी यावर भाष्य करणे टाळले. केवळ गैरसमजातून आ. शिंदे बोलत असल्याची प्रतिक्रिया मंत्री विखे यांनी दिली.
त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी या दोघांमधील वाद मिटविण्याचा प्रयत्न गेल्या शुक्रवारी नगर शहरात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असताना केला. मात्र, शह-काटशह देण्याचे राजकारण काही थांबले नाही. त्यातून उपमुख्यमंत्र्यांपाठोपाठ एकाच दिवसात मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे नियोजन करून पालकमंत्र्यांनी चौंडी येथील कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिल्यांदा निळवंडेच्या चाचणीचा शुभारंभ केला व त्यानंतर चौंडी कार्यक्रम झाला.