पुणे – विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात केली जाणाऱ्या “ऑनलाइन गेम’ने तरुणांभोवती विळखा घातला आहे. शहरातील छोट्या-मोठ्या चहा टपऱ्या, बाकड्यांसह रेल्वे स्थानकासारख्या ठिकाणीदेखील तरुण वर्ग मोबाइलमध्ये गुरफटलेला आढळत आहे. मानसिकदृष्ट्या या व्यक्ती कमजोर होत असून, आर्थिक अडचणीतही सापडत आहेत.
प्रसंग क्र. 1
नवी पेठ परिसरातील एका टपरीवजा चहा-नाश्त्याच्या हॉटेलात मागच्या भागात बैठक व्यवस्था आहे. संबंधित प्रतिनिधी तेथे सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास चहासाठी गेला होता. त्यावेळी चार तरुण भल्या सकाळच्या वेळी ऑनलाइन रमीसारखे गेम खेळत होते. त्यातील एकाने मित्राला फोन करून दोन हजार रुपये ऑनलाइन मागवून घेतले आणि गेममध्ये गुंतवले.
प्रसंग क्र. 2
धायरी परिसरातील एका उद्यानात नागरिकांसाठी आसन व्यवस्थेसाठी बाक आहेत. तेथे 19-20 वर्षे वयोगटातील दोघे मित्र आहे. त्यांनी ऑनलाइन गेम खेळणे सुरू करून कोण जिंकतंय अशी पैज लावली होती. जवळपास तासभर हे दोघेही जागेवरच बसून गेम खेळत होते. गेममधील कॅरेक्टर बहुतेक यांच्या मनासारखा खेळत नसावा. त्यामुळे हे दोघेही त्या कॅरेक्टरला सार्वजनिक ठिकाणी न शोभणाऱ्या शिव्या घालत होते.
चिंता, नैराश्यात वाढ
सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आजकाल मुले मानसिक आरोग्याच्या समस्यांच्या त्रासातून जात आहेत. त्यांच्यामध्ये तणाव, चिंता आणि नैराश्य वाढत आहे. तसेच, आत्मविश्वास, एकाग्रता आणि चांगली झोप यांचा अभाव आहे. किशोरवयीन मुलांच्या वर्तनातही झपाट्याने बदल होत आहेत. ते अधिक चिडचिडे आणि तापट स्वभावाचे होत आहेत.
40 टक्के पालक त्रस्त
देशातील 40 टक्क्यांपेक्षा जास्त पालकांनी मान्य केले आहे, की त्यांची मुले सोशल मीडियाचे व्यसन, व्हिडिओ पाहणे आणि ऑनलाइन गेम खेळत आहेत. या मुलांचे वय 9 ते 17 वर्षे दरम्यान आहे. “लोकल सर्कल’ या कम्युनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने हे सर्वेक्षण काही महिन्यांपूर्वी केले आहे. यातील बहुतांश मुले दररोज 3 तास इंटरनेटवर घालवत असल्याचे निरीक्षण पालकांनीच मांडले आहे.
असा करण्यात आला सर्व्हे
हे सर्वेक्षण भारतातील 287 जिल्ह्यांतील 65 हजार पालकांवर करण्यात आले. यामध्ये 67% पुरुष आणि 33% महिला होत्या. 51% लोक मेट्रो सिटी किंवा श्रेणी-1 शहरातील होते. तर 37% श्रेणी-2 आणि 12% श्रेणी-3 आणि श्रेणी-4 जिल्ह्यातील होते.
परदेशांत जातोय भारतीय पैसा
ऑनलाइन गेमिंग कंपन्यांनी मागील काही दिवसांत तब्बल 4 हजार कोटी रुपये परदेशांत पाठवले आहेत. परदेशात नोंदणीकृत असलेल्या आणि भारतात कार्यरत असलेल्या कंपन्यांविरुद्ध देशव्यापी शोध मोहिमेत हे आढळून आले आहे. याबाबत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काही दिवसांपूर्वीच माहिती दिली. तपास यंत्रणेने दि.22, 23 मे रोजी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये एकाच वेळी 25 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी ऑनलाइन गेमिंग कंपन्यांशी जोडलेली 55 बॅंक खाती जप्त करण्यात आली, ज्यामध्ये 19.55 लाख रुपये जप्त करण्यात आले.