सोलापूर – सोलापूर शहराशी जोडलेला बाबासाहेबांचा इतिहास आहे. मात्र जात-पात-धर्म करणाऱ्या केंद्र सरकारमुळे संविधानाला धोका निर्माण झाला आहे. याच विरोधात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे, अशा शब्दांत कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सोलापूर शहरातील पार्क चौक येथे संविधान भवनाच्या बांधकामाचे भूमिपूजन पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी सोलापूरचे पालकमंत्री दत्ता भरणे, आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे उपस्थित होते.
प्रणिती शिंदे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान ही अनमोल देणगी दिली आहे. परंतु केंद्रातील भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान आणि देशातील लोकशाही धोक्यात आली आहे.
जात-पात करणाऱ्या मोदी किंवा भाजप सरकारने देशात एक प्रकारचे संकट निर्माण केले आहे. देशाची लोकशाही टिकवायची असल्यास तरुणांनी शेवटच्या श्वाशापर्यंत लोकशाहीसाठी लढणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.