लखनौ – उत्तरप्रदेशला आम्ही पोलादी सरकार दिले होते तशाच स्वरूपाच्या सरकारची आज उत्तरप्रदेशला गरज असून लोकांना त्याची जाणीव आहे त्यामुळे मतदार यावेळी बसपालाच बहुमत देतील असा विश्वास बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी व्यक्त केला आहे. उत्तरप्रदेशात उद्या शेवटच्या टप्प्यातील मतदान होत आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी एका ट्विटर संदेशात त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
त्यांनी म्हटले आहे की, गरिबी आणि बेरोजगारीचा सामना करत असलेले उपेक्षित लोक त्यांच्या मतांच्या बळावर आपले आणि राज्याचे नशीब बदलण्याचे काम करू शकतात.हा बदल त्यांनी घडवून आणला पाहिजे. सर्वांचे कल्याण आणि समाधान सुनिश्चित करण्यासाठी उत्तरप्रदेशला बहुजन समाज पक्षाचे पोलादी सरकारच हवे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
विरोधकांकडून आजवर अनेक आश्वासने दिली गेली पण त्यातील कोणतीही आश्वासने त्यांना पुर्ण करता आलेली नाहीत. काहीं पक्षांनी अच्छे दिन चे आश्वासन दिले होते. पण त्यांच्या काळातच स्थिती अधिक बिघडली आहे त्यामुळे अशा पक्षांच्या शब्दांमध्ये न गुंतणेच शहाणपणाचे ठरेल असेही त्यांनी म्हटले आहे. या प्रचार काळात लोकांना भुलवण्याचे अनेक प्रयत्न झाले पण लोक येथील मलूभूत समस्यांच्या विषयाशी चिकटून आहेत असेही मायावती यांनी म्हटले आहे.