राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झालं. मात्र अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.त्यामुळे कोणाला नेमकं काय खात मिळणार याचा सस्पेन्स कायम आहे. त्यातच आमदार नितेश राणे हे मंत्री होणार का असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना विचारण्यात आला. कणकवलीत पत्रकारांशी संवाद साधताना राणे यांनी शिवसेनेवर कडाडून टीका केली.
शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे कट्टर विरोधक समजले जाणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सध्याच्या शिवसेनेवर भाष्य केलं आहे. मुख्यामंत्री असताना ठाकरेंना सरकार वाचवता आलं नाही याच्यासारखा दुर्दैव ते काय असं म्हणत शिवसेना संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असल्याची टीका राणे यांनी केली आहे.
शरद पवार यांनी कधीतरी चांगले बोलावे, सतत सरकार पडणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नाही म्हणून शरद पवारांसारख्या जेष्ठ माणसाने पाडायची भाषा न करता अभिनंदन करावे असही नारायण राणे यांनी म्हंटल आहे. तसेच शिवसेना आता कदापि उभी राहणार नाही अशी जहरी टीका यावेळी नारायण राणेंनी केली.
आमदार नितेश राणे हे मंत्री होणार का ? या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळत पक्ष काय तो निर्णय घेईल असे म्हटले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आजच दिल्लीला गेले असून, अद्याप यादी तयार झाली नसल्याचे देखील राणेंनी यावेळी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री असतना आमदार खासदार यांना न भेटणे मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करून ठेवणे यामुळेच ठाकरे यांच्या बाबतचा रोष निर्माण झाला असून,त्यामुळेच हे आमदार फुटले असल्याचं देखील राणेंनी यावेळी सांगितलं. तसेच मी या आधी देखील हे सरकार पडेल असं भाष्य केलं असल्याची आठवण देखील राणेंनी यावेळी करून दिली.
नारायण राणे हे गोव्यावरून जात असताना कणकवलीमध्ये थांबले होते. यावेळी राणेंनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला आणि सध्या राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी राणे यांच्या सोबत स्थानिक कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते,.