मुंबई – हरनाझ संधूने 21 वर्षांनंतर “मिस युनिव्हर्स’चा किताब भारताला मिळवून दिला आहे. तिच्यापूर्वी लारा दत्ताने 2000 साली आणि त्याच्याही पूर्वी सुष्मिता सेनने 1994 मध्ये हा किताब जिंकला होता. या दोघीही बॉलीवूडमधील यशस्वी अभिनेत्री बनल्या आहेत.
सौंदर्य स्पर्धांमधील यशस्वी सौंदर्यवतींनी बॉलीवूडमध्ये शिरकाव करणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. पण बहुतेक जणींनी सौंदर्य स्पर्धांनंतर बॉलीवूडमध्ये प्रवेश केला आहे. पण हरनाझ संधू त्याला अपवाद आहे. कारण तिने “मिस युनिव्हर्स” बनण्याच्या पूर्वीच दोन सिनेमे स्वीकारले आहेत.
याबाबतीत ती ऐश्वर्या, सुष्मिता आणि लारा दत्ता आणि अगदी कालपरवाच्या मानुषी छिल्लरच्याही दोन पावले पुढे आहे. “यारा दिया पू बालन’ आणि “बाई जी कुटांगे’ हे दोन पंजाबी सिनेमे तिने यापूर्वीच स्वीकारले आहेत. अर्थात या सिनेमांचे शूटिंग अद्याप झालेले नाही. आता काही दिवस तरी हरनाझ न्यूयॉर्कमध्येच राहील.
त्यानंतर तिला अनेक इवेंटसमध्ये सहभागी व्हायचे आहे. किमान वर्षभर तरी ती बिझी असेल. मात्र त्यानंतर तिला आपल्या पंजाबी सिनेमांचे काम पूर्ण करावे लागेल. नंतर ती बॉलीवूडमध्ये येण्याचा विचार करू शकते.