करोना रोगाबाबत धीर मिळेना, गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे कोणीच येईना
केडगाव – सध्या जगभरात करोना व्हायरस विषाणूची समस्या समस्या वाढत चालली आहे. जगातील अनेक देशांना या विषाणूच्या संकटाची चाहूल लागल्याने त्याच निर्मूलन करण्याची मोहीम सुरू झाली आहे. भारत देशातसुध्दा शासनपातळीवरही या रोगाचे निर्मूलन करण्याची मोठी कसरत सुरू आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देश आणि राज्यातील जनतेला जागरूक करण्याचे काम सुरू केले आहे. सार्वजनिक कार्यक्रम, सभा, निवडणुका, उद्घाटने, विकासकामाचे श्रेय घेण्यात पुढे असलेले नेते आत्ता गेले कुठे, असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर
आली आहे.
देशातील बहुतांश जनता ग्रामीण भागात राहत आहे, म्हणून गाव आणि तालुका पातळीवर असणाऱ्या पुढाऱ्यांनी आता जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. असा विचारप्रवाह जनमाणसांत सुरू आहे, परंतु दुर्दैवाने दौंड तालुक्यात तसे होताना दिसत नाही. करोनाचा प्रादुर्भाव अजून सुदैवाने तालुक्यात शिरकाव करू शकला नाही. परंतु जनता मात्र भयभीत आहे. या जनतेला अशा काळात आधार देण्याची गरज असताना कोणताही राजकीय पुढारी सार्वजनिकरित्या अजुनपर्यंत तरी पुढे असल्याचे दिसून येत नाही. एरव्ही सभा, समारंभ, लग्नकार्य आणि प्रचार सभातून जनतेचा कळवळा असणारे गाव आणि तालुका पातळीवरील पुढारी सद्यस्थितीला सामोरे जाताना दिसत नाहीत.
प्रचारकाळात मोठा खर्च करणारी पुढारी मंडळी सामाजिक आणि देशहिताच्या कामात मात्र चिडीचूप असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे संचालक, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य यांनी आपल्या वॉर्ड आणि मतदार संघातील लोकांना जागतिक समस्येवर मात करण्यासाठी सहकार्य करण्याची गरज आत्ता निर्माण झाली आहे. प्रत्येक गावात पुढाऱ्यांनी असे केल्यास या रोगावर विजय मिळवणे सहज शक्य आहे.
शिवाय आपला नेता सांगतोय म्हटल्यावर जनतेला धीर मिळेल, त्यांच्यात प्रतिकार शक्ती निर्माण होईल. त्यामुळे करोना विषाणू विरुद्ध सुरू केलेला लढा यशस्वी होण्यास बळ मिळेल. परंतु त्यासाठी गाव आणि तालुका पातळीवर काम करणाऱ्या पुढाऱ्यांनी जनजागृतीसाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.
मनी नाही भाव, देवा मला पाव
गावागावात सध्या करोना रोगाबाबत जनजागृती आरोग्य विभाग, राज्य, केंद्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु प्रत्येक शासकीय काम, वृक्षारोपण, गल्लीपासून दिल्लीपर्यंत गवगवा असलेल्या प्रत्येक कामात पुढे असलेले ग्रामपंचायत सदस्य ते आमदार, खासदार आत्ता जनतेसमोर येण्याऐवजी फेसबुक, व्हॉट्सऍप व सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करताना दिसून येत आहेत. त्यामुळे “मनी नाही भाव देवा मला पाव’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.