नंदुरबार :- नंदुरबार जिल्हा हा केंद्र सरकाराने आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केला असून आदिवासी दुर्गम भागात प्रतिकूल परिस्थितीत आरोग्यसेवा पुरविणाऱ्या डॉक्टर्स व आरोग्यकर्मींच्या वेतनात वाढ करण्यात येणार आहे. तसेच तरंगत्या दवाखान्यांच्या जागेवर लवकरच स्पीडबोटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांना आरोग्य सेवा दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.ते शहादा येथील ग्रामीण रूग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी येत्या दोन वर्षात 200 पेक्षा अधिक आरोग्य उपकेंद्रे, 56 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 11 ग्रामीण रूग्णालयांची निर्मिती व टाटा इन्स्टिट्युटच्या मदतीने नर्मदा काठावरील गावांनी स्पीडबोटी च्या मदतीने आरोग्य सुविधा सुरू केली जाणार असून त्यासाठी आवश्यकता पडल्यास आदिवासी विकास विभागातून निधी उपलब्ध करून दिला जाईल.
या सर्व निर्माण होणाऱ्या आरोग्य सुविधांसह इतर सुविधांशी वाड्या-पाड्यातला माणूस जोडला जावा यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक वाड्या-पाड्यात आणि गावात बारमाही रस्त्यांची निर्मिती येत्या दोन वर्षात केली जाणार आहे. व आज उद्घाटन झालेल्या ग्रामीण रूग्णालयास लवकरच उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा दिला जाणार आहे. त्याचबरोबर आदिवासी भागात प्रतीकुल परिस्थितीशी सामना करत आरोग्य सुविधा देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व आरोग्यकर्मी यांना प्रोत्साहनपर वेतनवाढ देण्याचाही विचार सचिवस्तरावरील चर्चेत केला असल्याचे पालकमंत्री डॉ. गावित यांनी सांगितले.
प्रत्येक कार्यालयात फेस रिडिंगद्वारे होणार हजेरी
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. गावित म्हणाले, आदिवासी दुर्गम भागात कनेक्टिव्हिटी वाढविण्यासोबतच या भागातील नागरिकांना चांगल्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी प्रत्येक कार्यालयात अधिकारी कर्मचाऱ्यांची हजेरी वेळेत असणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्या फेस रिडिंगद्वारे हजेरीचा राज्यातील आगळा वेगळा उपक्रम आपण जिल्ह्यात राबवणार असल्याचीही माहिती यावेळी पालकमंत्री डॉ. गावित यांनी दिली.