नवी दिल्ली – निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाला अंशतः दिलासा देत पुढील निर्णयापर्यत मशाल चिन्ह वापरण्यास परवानगी दिली आहे. परंतु, समता पक्षाने मशाल चिन्हावरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामुळे ठाकरे गटाची अडचण वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. परंतु, पुण्यातील पोटनिवडणुकीत ठाकरे गट मशाल चिन्ह वापरू शकते. तसेच, निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान दिलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल देईपर्यंत ठाकरे गट मशाल चिन्ह वापरू शकणार आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीतही ठाकरे गटाने मशाल चिन्हावर निवडणूक लढवली होती. समता पक्षाचेही पक्षचिन्ह मशाल आहे. त्यामुळे त्यांनी ठाकरे गटाला मिळालेल्या मशाल चिन्हावर आक्षेप घेत हे चिन्ह गोठवण्याची मागणी समता पक्षाकडून करण्यात येत आहे.
हे ही वाचा…. ‘मशाल चिन्ह’ मिळावे यासाठी सहकार्य करावे, बिहारच्या समता पक्षाच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट
बिहारहून समता पक्षाचे प्रतिनिधिमंडळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटीसाठी आले होते. उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहे. हे चिन्ह गोठवण्यास मदत करण्याची मागणी यावेळी प्रतिनिधिमंडळाने केली. ठाण्याच्या मध्यवर्ती कार्यालयात समता पक्षाचे प्रतिनिधिमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. या भेटीनंतरच समता पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.