सातारा -सातारा शहराच्या पश्चिम भागाला पाणीपुरवठा करणारा महादरे तलावाचा 30 फूट खोलीवर असणारा व्हॉल्व सोडून ठेवल्याने लाखो लिटर पाणी वाया जाऊन येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे मोरे कॉलनी व व्यंकटपुरा पेठेतील सायंकाळचा पाणीपुरवठा खंडीत होण्याची दाट चिन्हे आहेत. जाणीवपूर्वक करण्यात आलेल्या या खोडसाळ प्रकाराचा संताप व्यक्त होत आहे
सातारा शहराच्या पश्चिम भागाला कास तलावाबरोबर महादरे तलावातून सुद्धा पाणीपुरवठा केला जातो तब्बल 55 लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा असणारा या तलावाची पाणी पातळी तब्बल 45 फूट इतकी आहे. असे असताना ऐन फेब्रुवारीमध्ये तलावाचे पाणी तीन फुटावर कसे पोहोचले ? याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही दिवसापूर्वी माजी उपनगराध्यक्ष अविनाश कदम यांनी व्यंकटपुरात पेठेतील नागरिकांचा मोर्चा नगरपालिकेवर नेला होता. मात्र, पालिकेचे नळकरी शैलेश गवई यांनी ही गंभीर बाब प्रशासनाच्या समोर आणून दिली अज्ञाताने या महादरे तलावाच्या पूर्वेला असणारा तलावाचा दगडी व्हॉल्व खुला सोडून दिल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मात्र, हा प्रकार कोणी केला याविषयी मात्र तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत.
मंगळवार तळे परिसर हा सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी या दोन्ही गटासाठी अत्यंत संवेदनशील आहे. या खोडसाळपणे पाणी सोडून देण्याच्या प्रकारावर आता प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. माजी नगरसेवक वसंत लेवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, हा प्रकार जाणीवपूर्वक केला जाण्याची शक्यता आहे. महादरे तलावाचे पाणी जून महिन्यापर्यंत पुरते असा अनुभव आहे, असे असताना अचानक फेब्रुवारीतच पाणी आटते हे तार्किकदृष्टया पटणारे नाही. यामागे नक्कीच कुणीतरी हा खोडसाळपणा केला आहे आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याने केलेल्या तक्रारीमुळे सदर प्रकाराला पुष्टी मिळत आहे. विरोधकांनी कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला तरी आता थांबणार नाही. जे म्हणतात की पेठेत फुलपात्राएवढे सुद्धा पाणी मिळणार नाही, त्या भागामध्ये आम्ही बादलीने पाणी देणार आहोत. ज्या भागात पाणीटंचाई आहे तेथे दररोज दोन टॅंकरने पाणी वाटप केले जाणार असल्याचे वसंत लेवे यांनी सांगितले.