पुणे – दैनंदिन प्रश्न निकाली काढणे तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, पारदर्शक, कार्यक्षम आणि गतिमान होण्यासाठी महाराजस्व अभियान राबविण्यात येत असून, हे अभियान दि. 30 एप्रिल 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. या अभियानात प्रामुख्याने प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, अतिक्रमण केलेले अथवा बंद असलेले पाणंद रस्ते मोकळे करणे, मोजणीची प्रकरणे निकाली काढणे आदी कामे करण्यात येत आहेत.
राज्य शासनाचा महसूल विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. महसूल विभागाशी अनेक सेवा निगडीत असतात. भूमि अभिलेख व नोंदणी, मुद्रांक विभागाचा समावेश महसूल विभागात होतो. हा विभाग सर्वसामान्य नागरिक व शेतकरी यांच्याशी निगडीत आहे. त्यामुळे नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यसाठी शासन महाराजस्व अभियान राबवित आहे.
या अभियानात एक महिन्याच्यावर प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढणे, मंडल स्तरावर फेरफार अदालत घेणे, अकृषिक परवानगी दिलेल्या प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करुन गाव दप्तर अद्ययावत करणे, अतिक्रमित रस्ते, पाणंद, शेतरस्ते मोकळे करणे, गाव तिथे स्मशानभूमी, लोकसेवा हक्क अधिनियमाबाबत जनजागृती, मोजणी प्रकरणे निकाली काढणे, ई- पीक पाहणी प्रकल्पाची अंमलबजावणी करणे आदी कामे केली जाणार आहे.