पुणे -आडतदार, व्यापाऱ्यांनी शेतीमालाचे पैसे थकविल्यास किंवा व्यापारी पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्यास शेतकऱ्यांना बाजार समितीकडे तक्रार करता येते. 1 एप्रिल 2019 ते 1 डिसेंबर 2022 या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे तब्बल 100 विवाद निकाली काढण्यात आले. यामध्ये 3 कोटी 98 लाख 84 हजार 444 रुपये वसूल करून शेतकऱ्यांना देण्यात आले आहे.
सहायक सचिव प्रशासन वामन तुपे आणि विवाद शाखा प्रमुख शिवाजी कंद यांनी यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जिल्ह्यासह पुणे विभागातून शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणतो. य कित्येकदा आडतदारांच्या विश्वासावर मालाची विक्री केली जाते. काही आडते ताबडतोब शेतीमालाचे पैसे देतात. तर काही कालावधीने देतात. मात्र, काही घटना याला अपवाद ठरतात. आडते अथवा डमी आडत्यांकडून शेतकऱ्यांचे पैसे देण्यास टाळटाळ केली जाते. अशा वेळी शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र, थकलेले पैसे मिळवून देण्याची जबाबदारी कायद्यानुसार बाजार समिती प्रशासनाची आहे. शेतकऱ्यांनी पावती, बिल, पट्टीसह बाजार समितीकडे तक्रार केल्यास बाजार समिती प्रशासन त्वरित सुनावणी घेऊन शेतकऱ्यांना पैसे मिळवून देत असते.