लोणी देवकर (वार्ताहर) – इंदापूर तालुक्यात नीरा आणि भीमा या नद्यामुळे बागायत क्षेत्राचे प्रमाण जास्त आहे. कृषी उत्पादनात इंदापूर तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. यामध्ये अग्रस्थानी ऊस,द्राक्ष,डाळिंब आणि कांदा आदी पिकांसह केळीच्या उत्पादनातही जिल्ह्यात अग्रस्थानी असलेला तालुका म्हणून इंदापूरची ओळख आहे.
शेतीविषयी सरकारची नवीन धोरणे यामुळे शेतमालाला योग्य हमी भाव मिळत नाही. शेतकरी शेतीला पर्यायी जोडधंदा म्हणून दूध उत्पादनाकडे वळले. मात्र, सध्या दूध व्यवसाय पूर्णपणे कोलमडला असून दुष्काळी परिस्थिती दुधाला १८ ते २० रुपये भाव दर मिळूनही अनुदानही रखडले आहे.
पण अलीकडच्या काळामध्ये वाढत चाललेली महागाई आणि कमी होत चाललेले दुधाचे दर यामुळे दूध उत्पादक चिंतेत आहे. या वर्षात बाजारभावात झालेली घट आणि दूध उत्पादनासाठीचा प्रतिलीटर ३० रुपये खर्च येतो.त्यातच दुष्काळजन्य परिस्तिथी वाढलेल्या पशुधनाच्या किमती आणि हिरव्या चाऱ्याचा तुटवडा जनावरांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा यामुळे दूध उत्पाक शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.
बाजारात सर्व सामान्यांना दूध ४० रुपये लिटर याप्रमाणे मिळते. परंतु तेच दूध शेतकऱ्यांकडून २० रुपये दराने घेऊन विकताना खाजगी दुधसंघ मोठे होत गेले. पण दूध उत्पादक गरीबच राहिला. यामध्ये दूध संघाचे मालक कोट्याधीश झाले. तर दूध उत्पादक आजही त्याच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी धरपडतो आहे.
काही शेतकरी उपजिविकेसाठी स्वतः दूध संकलन करून मोठ्या शहरात स्वतःच्या मोटर सायकलवर जाऊन घरोघर दूध विक्री करतात. उत्पादनासाठी येणारा खर्च जनावर खरेदी,पशु खाद्य खर्च, मजुरी जाता दूध उत्पादक शेतकऱ्याला उपजीविकेसाठी सुद्धा पैसे राहत नसल्याची खंत शेतकरी वर्गातून होत आहे.
हे सर्व होत असताना शासनाकडून दूध उत्पादकांना प्रति लिटर अनुदान जाहीर केले होते. परंतु आजतगायत सरकारकडून अनुदानाची कोणतीही रक्कम जमा झाली नसल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.इंदापूर तालुक्यासारख्या सुजलाम सुफलाम भागातील दुधउत्पादक शेतकऱ्यांवर जनावरे वाचविण्यासाठी मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे.