लोणी देवकर, (वार्ताहर) – लाल गुलाबी रंगाची उधळण करीत आकाशातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून उजनी धरनातील पाणीसाठा कमी झाल्याने उथळ पाण्याच्या ठिकाणी आलेल्या पाहुण्या फ्लेमिंगो रोहित पक्ष्यांनी उजनीच्या वैभवात शेकडोच्या संख्येने भर घातल्याने उजनीचा परिसर अतिशय देखणा बनला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले परदेशी पाहुणे; अर्थात ‘फ्लेमिंगो’ उर्फ रोहित पक्ष्यांचे उजनी जलाशयात आगमन झाले असून पक्षीप्रेमींचे पाय जलाशयाच्या दिशेने पडू लागल्याचे चित्र आहे.
तब्बल दोन-अडीच महिन्यांच्या काळानंतर हजारो किलोमीटरचा प्रवास करून रोहित पक्षी उजनी जलाशयाच्या पाणथळ भागात दाखल झाले आहेत. डिकसळ पूल, भिगवण, तक्रारवाडी, पळसदेव, शिंदेवस्ती आणि खादगाव या ठिकाणी सध्या रोहीत उर्फ फ्लेमिंगोचे वास्तव्य आढळत असून जवळपास चारशे ते पाचशेच्या संख्येने हे पक्षी दाखल झाले आहेत.
या पक्ष्यांचे थवेच्या-थवे असल्याने पाण्यात त्यांच्या जणू काही कवायती चालल्याचा भास होतो. गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने उजनी जलाशयात मुबलक पाणीसाठा होता. पाणथळीच्या जागा उपलब्ध नसल्याने या ठिकाणी खाद्य मिळत नव्हते. त्यामुळे यंदा पक्ष्यांचे आगमन लांबणीवर पडले होते. त्यामुळे पक्षीप्रेमींची निराशा झाली होती.
त्यांच्या आगमनाची सर्व जण आतुरतेने वाट पाहत होते. उजनी धरण साखळीतील पाणीसाठा कमी झाल्याने मागील सात आठ दिवसांपासून चारशे-पाचशेच्या आसपास पाणलोट क्षेत्रात फ्लेमिंगो दाखल झाल्याने पक्षी प्रेमींत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महिनाभरात आणखी पक्षी दाखल होऊन रोहित पक्ष्यांच्या सुंदर ‘कवायती’ पाहायला मिळतील, अशी अपेक्षा पक्षीप्रेमी व्यक्त करीत आहेत.
रोहित पक्षांचे आगमन उशिरा झाले असले, तरी या ठिकाणी सिगल, राखी बगळा, करकोचा, काळा शराटी, पेंटेड स्टॉर्क, पाणकोंबड्या, तूतवार तापस आदी जातींचे पक्षी दाखल झाल्याने उजनी काठ चांगलाच बहरून गेला आहे. राज्यातील पर्यटकांसाठी पक्षी पाहण्याची ही अनोखी संधी उपलब्ध होणार आहे.
अग्निपंखाची मोहिनी…
लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच असणारे पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही संबोधले जाते. हजारोंच्या संख्येने पक्षी दाखल झाल्यावर त्यांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली नेत्रसुखद ठरतात व भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो.
परप्रांतीय व वाळू व्यावसायिकांचा त्रास
उजनी जलाशयात मासेमारी चालते. यामध्ये परप्रांतीय मच्छिमारांकडून पक्ष्यांची शिकार करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्याचप्रमाणे याच परिसरात यांत्रिकी बोटीच्या साह्याने वाळू काढण्याचे प्रकारदेखील घडतात.
त्यामुळे बोटींच्या कर्णकर्कश आवाजाने; तसेच बोटींसाठी वापरण्यात येणारे ऑईल पाण्यात पडण्याने पाणी प्रदूषणाच्या समस्यांनादेखील पक्ष्यांच्या अधिवासावर परिणाम झालेला आहे.