लोणी देवकर, {योगेश कणसे} – उजनी धरणाच्या निर्मितीनंतर धरणाच्या पोटात लुप्त झालेल्या विविध वास्तुंचे अवशेष जलाशयाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याने पाण्याबाहेर डोकावू लागले आहेत. धरण बांधले जात असताना जवळपास शेजारील ५२ गावांना पुनर्वसित व्हावे लागले होते. उजनीतील या पुनर्वसित गावांच्या मुळ गावठाणातील विविध बांधकामांचे उघडे पडलेले अवशेष जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.
राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण म्हणून नोंद असलेल्या उजनीचा विस्तार फार मोठा आहे. साधारणत:१४० कि.मी. लांबी आणि सहा किलोमीटर रूंदी असा पसारा असलेले उजनी धरण पुणे, सोलापूरसह अहमदनगर, अशा तीन जिल्ह्यांना जोडणारे व वरदायिनी ठरले आहे. उजनी धरण निर्माण होत असताना या तीन जिल्ह्यातील भीमा नदीकिनारी असणाऱ्या एकूण ५२ गावांना विस्थापित व्हावे लागले होते.
धरणाच्या निर्मितीनंतर १९८० च्या सुमारास धरण पूर्ण भरल्यानंतर या विस्थापित गावांची मूळ गावठाणे पाण्याखाली गेली होती. या मुळ गावठाणांसह संबंधित गावातील ग्रामस्थांच्या जमिनी, घरे तसेच विविध पुरातन मंदिरे,समाधीस्थळे, रस्ते आणि रेल्वे मार्ग आदी पाण्याच्या पोटात लुप्त झाले होते. दरम्यान धरणामुळे विस्थापित झालेल्या गावातील ग्रामस्थांनी धरणासाठी त्याग करून पुनर्वसन स्वीकारत नव्याने आपल्या संसाराला सुरुवात केली.
मात्र, मूळ गावातील घरे जमिनी यांच्याशी जुळलेली नाळ त्यांच्या मनात कायम राहीली होती. अशा स्थितीत जेव्हा धरणातील पाणीसाठा खालावेल तेव्हा हे धरणग्रस्त आपली जुनी गावठाणे नजरेत साठवताना आढळून येतात. या यावर्षी उजनीने तळ गाठायला सुरुवात केली असताना पुनर्वसित गावातील ग्रामस्थांच्या जुन्या आठवणी ताज्या होत आहेत.
यावर्षी उन्हाळ्यात उजनीची पाणी पातळी कमालीची घटली असून सद्यस्थितीत जवळपास वजा ३७ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. उजनी जलाशयातील पाणी पातळी मोठ्या प्रमाणात घटल्यामुळे विविध विस्थापित गावांची मुळ गावठाणे पाण्याबाहेर पडली आहेत. तसेच संबंधित गावातील जुन्या वास्तुचे अवशेष नजरेस पडत आहेत.
उजनी धरणाच्या निर्मितीनंतर साधारणत : ४० वर्षे पाण्यात राहिल्यानंतरही जुन्या बांधकाम काही प्रमाणात पडझड झालीय. मात्र तरीही त्या काळातील जुनी दगडी बांधकामे हि नजरेस भक्कम भासतात. परिणामी सदरची बांधकामे व जुन्या गावठाणातील आपली जागा पाहताना व जुन्या आठवणी कुतुहलाचा विषय ठरत आहेत.
उजनीचे पाणी घटले असताना भीमा नदी पात्रातील कुगाव येथील देवराव, जिजाबा, नागोबा या इनामदार बंधुंनी साधारण :चारशे वर्षांपूर्वी भीमा नदीच्या तीरावर बांधलेला भव्यदिव्य वाडा पाण्याबाहेर पडला आहे. या वाड्याची आत मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असली तरी मुख्य दरवाजा, एक बुरूज, वाड्याच्या आतील विहीर, मजबूत दगडी तटबंदी आदींसह प्रवेशद्वाराजवळचा कमानींचा भाग वाड्याची दगडी रचना व भव्यता दर्शवत आहेत.
इनामदारांचा वाडा ठरतोय आकर्षण…
प्रसिद्ध सैराट चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण करमाळा तालुक्यात विशेषत :उजनी परिसरात झाले. यात चित्रीत झालेला कुगाव येथील धरणात बुडालेला इनामदारांचा वाडा या वास्तूचे सैराटमुळे जगाला दर्शन झाले. यावर मोठ्या प्रमाणावर पाणी खाली गेल्याने हा वाडा उघडा पडू लागल्याने पुन्हा पर्यटक या कडे आकर्षिले जाऊ लागले आहेत.