राजगुरूनगर (प्रतिनिधी)- खेड तालुक्यातील पशुपालक शेतकर्यांनी आपल्या जनावरांना इअर टँगिंग 12 अंकी आकड्यांचा बिल्ला केंद्र शासनाने बंधनकारक केला असून पशुपालकांनी आपल्या पाळीव जनावरांना त्वरीत टँगिग करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. योगेश शेळके यांनी केले आहे.
भारत सरकारने 1 एप्रिलपासून पशुपालक सर्व जनावरांना ईयर टँगिंग बंधनकारक केले. पशुवैद्यकीय दवाखान्यात येणार्या जनावरांच्या सर्व तपासण्या, लसीकरण, एक्स-रे, सोनोग्राफी, उपचार करण्यासाठी शासनाच्या एनडीएलएम अॅपवर नोंद करणे बंधनकारक केले आहे. गाय, म्हशी, शेळ्या, वासरु, बैल, गो-हे, रेडे आदी पाळीव जनावरांसाठी नोंद ऑनलाइन अॅपवर होणार आहे.
जंगली वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात पशुधनाचा मृत्यू झाल्यास वनविभागाने नुकसानभरपाई देताना इअर टँगिग असेल तर अशा पशुपालकांना यापुढे नुकसान भरपाई मिळेल. संसर्गजन्य आजाराने अथवा नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावर दगावले तर नुकसान भरपाई करिता जनावरांचे इअर टॅगिंग असणे बंधनकारक आहे.
खरेदी विक्री होणार्या जनावरांना इअर टँगिग असेल तरच व्यवहार होणार आहेत. महाराष्ट्राबाहेरील राज्यातून जनावराना इअर टॅगिंग असेल तरच आपल्या राज्यात आणता येणार आहे.
दुधाचे अनुदान देताना दुग्ध उत्पादक शेतकर्यांच्या नावे दूध देणा-या नोंद ऑनलाईन किती आहे हे पाहूनच अनुदान देण्यात येणार आहे. दुष्काळी परिस्थितीत चारा छावणीत दाखल होणा-या जनावरांसाठी टँगिंग केलेल्या पात्र जनावरांना ग्राह्य धरुन चारा छावणीत दाखल करुन घेण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.
खेड तालुक्यातील पशुपालकांनी आपल्या सर्व जनावरांना ईयर टँगिग करुन घ्यावे अन्यथा शासनाकडुन कोणतेही उपचार, नुकसान भरपाई, अनुदान आदि कोणताही लाभ मिळणार नाही. असे शासनाचे स्पष्ट निर्देश दिले असल्याची माहिती खेड तालुका पशुचिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत पोखरकर यांनी दिली.
दवाखान्यात, गोठ्यावर जाऊन टॅगिंग
खेड तालुक्यात 64,981 गायी, बैल वासरे आहेत. 28,838 म्हशी, टोणगे, पारडे आहेत. सुमारे 32,800 शेळ्या व 3,513 मेंढ्या अशी एकूण पशुधनाची नोंद आहे. या सर्वांना आरोग्य सेवा देण्यासाठी तालुक्यात राज्य सरकारचे 13 दवाखाने तर पुणे जिल्हा परिषदेचे 24 दवाखाने कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून पशुधनावर उपचार केले जातात. राज्य सरकारचे 13 आणि पुणे जिल्हा परिषदेचे 24 जनावरांच्या दवाखान्यात व शेतकर्यांच्या गोठ्यावर जाऊन टॅगिंग केले जात आहे.