मुंबई : ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी शेतीला जोडधंदा आवश्यक आहे. त्याशिवाय ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारणे शक्य होणार नाही. कोरोना काळामध्ये दूध खरेदी करुन दुधाची भुकटी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जोपर्यंत दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढणार नाही. तोपर्यंत अर्थव्यवस्थेला बळकटी येणार नाही. दुधाचे शहरी व नागरी भागातील वेगवेगळे दर पाहता यासाठी दुधावर प्रक्रिया करणारे उद्योग वाढणे आवश्यक आहे, असे पशुसंवर्धन व दुग्धविकास, क्रिडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत सांगितले.
260 अन्वये प्रस्तावावर उत्तर देतांना मंत्री केदार बोलत होते. मंत्री केदार म्हणाले, क्रीडा संकुलाबाबत तालुका, जिल्हा स्तरावर जिल्हा नियोजन समितीचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडून पालकमंत्री यांच्याकडे देण्यात आले. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीचे वितरण योग्य प्रमाणे होण्यास मदत होणार आहे.
तरुण पिढीला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासन कटिबद्ध
राज्यातील क्रीडा विभागांतर्गत जी संकुले आहेत त्या ठिकाणी माजी सैनिकांची क्रीडा संकुलामध्ये प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. याबाबतच संबंधित विभागाकडून यादी मागविली आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडा केंद्र स्थापन केले असून यामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाने क्रीडा कोर्सला मान्यता दिली आहे. पब्लिक प्रायव्हेट प्रायव्हसी तत्वावर राज्यात मोठी संकुले उभी करण्यात येणार आहेत.
राज्यातील तरुण पिढीला स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यापुढे महाराष्ट्र हे देशाला एक नवी दिशा देणारे राज्य असेल. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा क्षेत्रातील मुलांना नोकरीमध्ये भरतीबाबत अधीकचे गुण देण्याबाबत प्रस्ताव विचाराधिन आहे. तालुक्यातील क्रीडा संकुलाची योग्य दखल घेऊन तालुका स्तरावर पाच कोटी, जिल्हा स्तरावर 25 कोटी आणि विभागीय स्तरावर 50 कोटी रुपये अशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. बीडचे क्रीडा संकुल सुस्थितीत आहे की नाही हे पाहून या क्रीडा संकुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात येईल.