रांजणी – सध्या करोनाचा संसर्ग राज्याच्या सर्वच भागात सुरू आहे.करोनाच्या महामारीमुळे बहुतांशी शेतकऱ्यांचा रोजगार बुडाला आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतीला जोडधंदा असलेला दुधाचा व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. कारण दुधाला मागणी असूनही केवळ योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले दिसून येते. दुभत्या जनावरांचा चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या खर्चासाठी नुसती कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आल्याचे चित्र दिसून येते.
राज्यात पुणे जिल्हा दूध उत्पादनात अग्रेसर मानला जातो. जिल्ह्यातील विशेषतः आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर या तालुक्यात दुधाचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आहे आणि व्यवसायामुळे अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत; परंतु गेल्या चार महिन्यांपासून करोनाच्या महामारीने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णतः कोलमडून टाकले असल्याचे दिसून येते. सरकारने दूध उत्पादकांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले तरी त्याचा थेट फायदा गावातील दूध उत्पादकापर्यंत पोहचत नाही.
पुणे जिल्ह्यात शंभरहून अधिक खासगी दूध संघ आहेत; परंतु या दूध संघाकडून शेतकऱ्यांच्या दूधाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या भरडला जातोय. खरे तर सरळसरळ शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जात असल्याची बाब करोनाच्या पार्श्वभूमीवर दिसून येते. कोणीही शेतकऱ्यांची दखल घेत नाही हेही तितकेच खरे! पूर्वी गायीच्या दुधाचा 28ते 30 रुपयांपर्यंत दर होता; परंतु तो आता 18 ते 20 रुपयांखाली आला आहे. म्हशीच्या दुधासाठी 32 रुपयांपर्यंत दर मिळत होता तोही दर आता कमी झाला आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना दुभत्या जनावरांना जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहेच.
पशुखाद्याचे दर चढेच…
किमान एका गाईला दिवसाला तीन ते चार किलो ओला आणि सुका चारा लागतो. तेवढेच पशुखाद्य ही लागते या संपूर्ण खर्चाचा मेळ बसवण्यासाठी नुसती शेतकऱ्यांना कसरत करावी लागते. सध्या बाजारातील पशुखाद्याचे दरही गगनाला भिडले आहेत. सुग्रासचे एक पोते 50 किलोचे बाराशे ते चौदाशे रुपये एवढ्या किमतीला विकले जाते. खापरी पेंड प्रति 50 किलो 2200 ते 2400 रुपये, मक्याचा भरडा प्रति 50 किलोला 800 ते 900 रुपये याप्रमाणे विकला जातो. करोनाच्या पार्श्वभूमीवर ही बाब शेतकरी वर्गाला निश्चितच परवडणारी नाही.
माझ्याकडे म्हशी आणि गायींचा गोठा आहे; परंतु दुधाला दर नसल्याने सध्या अडचण निर्माण झाली आहे. पशुखाद्याचे दर परवडत नसल्याने दूध कमी किमतीला विकणे परवडतच नाही. त्यामुळे दूधव्यवसाय अडचणीत आला आहे.
-आदित्य गुंजाळ, दूध उत्पादक शेतकरी