इस्लामाद – पाकिस्तानमध्ये वारंवार होत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमागील दहशतवाद्यांना शेजारील अफगाणिस्तानमध्ये आश्रय मिळत आहे, असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे. ही बाब पाकिस्तान कधीही सहन करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
शेजारी आणि बंधू देश असण्याचा हक्क अफगाणिस्तान बजावत नाही. दोहा कराराचे पालन केले जात नाही. तब्बल 50 ते 60 लाख अफगाणी गेल्या 40 ते 50 वर्षांपासून पाकिस्तानमध्ये आश्रय घेऊन राहात आहेत. त्यांना येथे सर्व अधिकार मिळत आहेत.
मात्र त्याच्या उलट जे दहशतवादी पाकिस्तानमध्ये रक्तपात करत असतात, त्यांना अफगाणिस्तानमध्ये आश्रय दिला जातो. आपल्या भूमीचे आणि आपल्या नागरिकांचे रक्षण करण्याचे सर्व मार्ग पाकिस्तानकडून वापरले जातील. असेही आसिफ म्हणाले.
अफगाणिस्तानने पाकिस्तानवरील हल्ल्यांसाठी दहशतवाद्यांना आपल्या भूमीचा वापर करू देऊ नये, असे पाकिस्तानच्या लष्कराने म्हटले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संरक्षणमंत्र्यांनी ही नाराजी व्यक्त केली आहे.
दिनांक 13 जुलै रोजी बलुचिस्तानमध्ये दोन वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचे 13 सैनिक मारले गेले आहेत. पाकिस्तानी तालिबान दहशतवाद्यांच्या गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.