नवी दिल्ली : सर्व सुरक्षा साधने वापरून मल्टीप्लेक्स, सिनेमागृहे आणि मेट्रो रेल्वे सुरू करावी. आंतरराष्ट्रीय विमानांना परवानगी द्यावी, अशी मागणी फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने केली आहे.
स्थानिक पातळीवर शाळा आणि महाविद्यालये सुरू कारावीत, आदर्श आचारसंहितेचा अवलंब करून अनेक निर्बंध उठवता येतील, असे फेडरेशनच्या निवेदनात म्हटले आहे. प्रवासासाठी भारतीय आणि परदेशी विमानांना परवानगी द्यावी. रेस्टॉरंट खुली करावीत. हॉटेलमध्ये खाद्यपदार्थांना परवानगी द्यावी, सिनेमागृहे खुली करावीत, रेल्वेसेवा आणि मेट्रोसेवा सुरू करावी, अशी मागणीही फेडरेशनने केली आहे.
करोनाशी दीर्घकाळ लढावे लागणार आहे. एवढा काळ लॉकडाऊन ठेवणे कोणत्याही अर्थव्यवस्थेला परवडणारे नाही. देशातील अनेक भागात लॉकडाऊन वाढवला असल्याने व्यवसायांची स्थिती आणि सामान्यांचे जीवन हलाखीचे झाले आहे, याकडे फेडरेशनने लक्ष वेधले आहे.
31 जुलै रोजी अनलॉक दोनची मुदत संपत आहे. देश अनलॉक तीनची तयारी करत आहे. त्यावेळी करोनाची भीती मनात ठेवून अनेक सध्याचे निर्बंध उठवण्याची गरज आहे. करोनाचे संकट ओसरले नसल्याने आपण सतर्क राहण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नागरी उड्डाण, क्रीडा आणि पर्यटन क्षेत्र खुले करण्याची गरज आहे. त्यासाठी आचारसंहिता लिखीत स्वरूपात द्यावी, अशी सूचनाही फेडरेशनने केली आहे.