नवी दिल्ली – चक्रीवादळांसारख्या हवामानाच्या घटनांचा वेळेवर अंदाज देऊन खोल समुद्रात जाणाऱ्या लोकांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे कौतुक केले. ते म्हणाले की, शेत नांगरणारा शेतकरी असो किंवा देशाच्या सीमांचे रक्षण करणारा सैनिक असो, आयएमडीने सर्वांसाठी मार्ग सुकर केला आहे.
यावेळी उपराष्ट्रपतींनी हवामान खात्याचे मोबाइल ॲप मौसम देखील लॉन्च केले. याॲपद्वारे हवामान विभागामार्फत पुरवल्या जाणाऱ्या सर्व सेवा एकत्रित केल्या आहेत. त्यात हवामान सेवा निर्णय समर्थन प्रणाली, हवामान सेवांसाठी राष्ट्रीय फ्रेमवर्क यांसारख्या नवीन उपक्रमांचाही समावेश आहे.
राज्यसभेचे अध्यक्ष असलेले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी येथे आयएमडीच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर चालणाऱ्या सोहळ्याचा शुभारंभ करताना ही टीप्पणी केली. देशाचे हवामान खाते एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचले आहे. त्याची प्रासंगिकता आणि उत्तरदायित्व सतत वाढत आहे, असे ते म्हणाले.
अंदाजात अचूकता, चक्रीवादळांची वेळेवर माहिती आणि हंगामी चढउतार यामुळे आयएमडीचा झेंडा जगभर फडकत आहे. एक काळ असा होता की वैज्ञानिक प्रगतीच्या अभावामुळे हवामान खात्याचे अंदाज अचूक ठरत नव्हते. त्यामुळे अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागले. पण बदलत्या काळानुसार, आज हवामान खाते अचूक अंदाज बांधत आहे.