नवी दिल्ली -दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील गलिच्छ राजकारणाने माझे मानसिक खच्चीकरण झाले होते. खूप काही सहन केले. मात्र, सहन करण्यापलीकडे परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अत्यंत दुखीः अंतःकरणाने मी भारतीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला, अशा शब्दात उन्मुक्त चंदने आपली खदखद बोलून दाखवली.
भारताला 19 वर्षांखालील विश्वकरंडक जिंकून दिलेल्या चंदने वयाच्या 28व्या वर्षी भारतीय क्रिकेटला रामराम ठोकला. 13 ऑगस्टला त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेत अमेरिकेतील व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केले होते.
उन्मुक्त चंद म्हणाला, गेली काही वर्षे माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी होती. गेल्या मोसमात मला एकही सामना खेळता आला नाही. खरेतर खेळू दिला नाही, असे म्हणावे लागेल. संघटनेत तसेच त्यांच्या दृष्टीकोनात काहीही बदल होत नव्हते.
सातत्याने तेच लोक निवडून येत होते व मला संधी दिली जात नव्हती. मैदानावर एका खुर्चीत बसून राहणे व घरात राहणे सारखेच वाटत होते. खूप मानसिक खच्चीकरण होत होते. कारण ज्या खेळाडूंना सामना खेळण्याची संधी मिळत होती. त्यांना मी क्लब टीममध्ये सहभागी करणार नाही.
मी याबाबत विचार करून माझा वेळ वाया घालवू इच्छित नव्हतो. यासाठी मी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला, असेही चंदने सांगितले.