मुंबई – काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेसची धडधडणारी तोफ आज शिंदे गटात सामील झाली आहे.
यावेळी राजू वाघमारे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. ”काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करते का? असा प्रश्न आहे. संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिमची जागा मागितली.
मात्र, त्यांच्यावर दबाव आणत पक्षाबाहेर काढले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्त सांडत जागा आमची असल्याची सांगावे लागत आहे. भिंवडीची जागा थेट शरद पवारांनी जाहीर केली. याचा परिणाम माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर झाला आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांना भविष्य कळत नाही काय आहे? त्यांना दिशा दाखवण्यासाठी आज मी पक्षप्रवेश करतोय”, असे म्हणत राजू वाघमारे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजू वाघमारे यांचे शिवसेनेत स्वागत केले. त्यानी वाघमारे यांना शिवसेनेचा भगवा ध्वज दिला.
काँग्रेसचा झेंडा, अजेंडा शिल्लक नाही
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला. ”राज्यात काँग्रेसचा झेंडा आणि अजेंडा शिल्लक राहिलेले नाही. 35 वर्षे प्रामाणिकपणे राजू वाघमारे यांनी पक्षाचे काम केले.
त्यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची पक्षात घुसमट होत होती. यामुळे त्यांनी चांगला निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अनेक प्रकल्प थांबले होते. आता जोरदार काम सुरू आहे”, असे शिंदे म्हणाले.