नागपूर – महाराष्ट्र विधिमंडळाच्या (Maharashtra Widhimandal) कामकाजाचे कौतुक देश पातळीवर केले जाते. पण, विधिमंडळाच्या इतिहासात प्रथमच घाणेरडे राजकारण करण्याचे काम भाजप करत आहे. त्याचे दर्शन झाले. शेड्युल दहाप्रमाणे माननीय अध्यक्ष यांना सर्वाधिकार आहेत. परंतु, वेळेच्या बंधनात त्यांनी निर्णय घेणे अपेक्षित होते. सुप्रीम कोर्टाला अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढावे लागले. विधिमंडळाच्या व्यवस्थेला कलंक लावण्याचे काम आताचे लोक करतात अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याकडून करण्यात आली आहे.
शिवसेना आमदार (Shivsena Mla) अपात्रता प्रकरणावर विधिमंडळात कालपासून (ता. 21) सुनावणीला सुरुवात झाली आहे. दोन्ही बाजूच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करून आपापली बाजू मांडण्यात येत आहे. परंतु, आज विधिमंडळात झालेल्या सुनावणीत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रोसिडिंगमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव टाळल्याने एका नव्या वादाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांनी केलेल्या या चुकीवरून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress) यांनी विधानसभा अध्यक्षांना इशारा दिला आहे.
नाना पटोले म्हणाले, आज सुनावणीमध्ये ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी आपल्या साक्षीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr B R Ambedkar) यांच्या संविधानामुळे मी आमदार झालो असे म्हटले. पण, त्यांनी केलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामोल्लेख प्रोसिडिंगमध्ये येऊ द्यायचा नाही. या पद्धतीने विधानसभा अध्यक्षांच्या बाजूने अशी कारवाई होत असेल तर ते फारच चुकीचे चालले आहे. त्या प्रोसिडिंगमध्ये दुरुस्ती व्हावी. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही यावर चर्चा करू. विधानसभा अध्यक्ष यांना अधिकार असतात. मात्र, याप्रमाणे विधिमंडळाच्या कामकाजाला काळीमा लावण्याचे काम होत असेल तर त्यात आम्हाला शांत बसता येणार नाही. त्याचा आम्ही जाब विचारू, असा इशाराही त्यांनी दिला. (Rahul Narvekar)
भाजपचा चिडलेला चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. पाच राज्यात जी निवडणूक होत आहे. त्यामध्ये त्यांची हार ठरलेली आहे. आमचे नेते राहुल गांधी आणि राष्ट्रींय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विधान सभा निवडणूक लढवीत आहोत. प्रधानमंत्री, गृहमंत्री यांच्या सभेला लोक जमा होत नाही. त्यामुळे त्यांची हार ही निश्चित ठरलेली आहे. अशावेळी सूड उगवून भाजपने नॅशनल हेराल्डवर कारवाई केली असा आरोपही पटोले यांनी केला.