अकोले -अकोले येथील प्रवरा नदीपात्र काठी जेसीबी मशिनच्या साह्याने पाच खड्डे घेऊन सांडपाणी त्या खड्ड्यांमध्ये वळविण्याचे काम अकोले नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी युद्धपातळीवर केले. त्यामुळे प्रवरा नदीपात्रात होणारे जलप्रदूषण थांबविणारे प्रभावी काम त्यांनी सुरू केले आहे. त्यांच्या या कामाबद्दल अकोलेकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
‘संथ वाहते प्रवरा माई। गटार गंगा ही सामावून घेई।।’ अशा मथळ्याची बातमी 18 एप्रिल रोजी दैनिक “प्रभात’ मध्ये प्रसिद्ध झाली होती. नदीपात्रात दुथडी पाणी आहे. अकोल्याच्या पूर्व भागामध्ये नदीकाठी असंख्य गावे आहेत.
त्यामुळे हे जलप्रदूषण रोखावे. अकोले नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशा आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. पण त्या बातमीत निवडक नगरसेवकांनी नथीतून तीर मारून नगराध्यक्षाबरोबरच उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकाऱ्यांही लक्ष केले. त्यात मुख्याधिकारी डॉ. पटेल हे आमचे अजिबात ऐकत नाहीत. ते जमिनीवर पाय ठेवून चालत नाहीत. किंबहुना त्यांच्या स्वतःच्या मनाने निर्णय घेतात. या व अन्य तक्रारी त्यांनी केल्या होत्या. या सर्व गोष्टींचा डॉ. पटेल यांनी तातडीने इन्कार केला आपल्याकडून हे काम बाकी राहिलेले आहे.
ते आपण नजीकच्या काळात करू असे जाहीर केले होते.डॉ. पटेल यांनी या जलप्रदूषणाच्या संदर्भात तातडीने एक जेसीबी मशीन बोलावले. नदीकाठी खड्डे घेतले आणि येणारे सांडपाणी त्यामध्ये वळवले. त्यामुळे हे सांडपाणी त्यामध्ये जाऊन स्वाभाविकपणे प्रदूषण होणारे गटार गंगेचे पाणी या खड्ड्यांमध्ये जिरणार असल्याने जलप्रदूषणाचा मोठा धोका हा टळला आहे. डॉ. पटेल हे अतिशय कर्तव्यदक्ष आणि सर्वच आघाड्यांवर अतिशय तत्परतेने पावले उचलतात. याचाच एक भाग म्हणून त्यांनी सांडपाणी व्यवस्थापनासाठी जलप्रदूषण निस्सार योजना या खाली वरिष्ठ कार्यालयाला एक प्रस्ताव दाखल केला आहे. तो लवकरच मंजूर होऊन सांडपाणी व्यवस्थापनाला एक नवीन आयाम प्राप्त होणार आहे.
त्यामुळे त्यांच्या या धाडसी पावला बद्दल सर्वांनी स्वागत केले आहे. विशेष बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात त्यांनी तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांच्या बरोबरीने सतत सतर्क व सजग राहून करोना हटाव या मोहिमेला बळ दिले. त्यामुळे त्यांचा मोठा चाहता वर्ग अकोले शहरात तयार झाला आहे.
येणाऱ्या अडचणी संदर्भात अकोलेकरांनी थेट संपर्क साधावा. आपले म्हणणे लेखी स्वरूपात द्यावे. त्याचे निराकरण केले जाईल. शिवाय सामाजिक किंवा सार्वजनिक हिताच्या समस्या आपल्यापुढे मांडाव्यात. त्यातून निश्चितच मार्ग काढण्याचा शंभर टक्के प्रयत्न राहील. यासाठी जनतेने साथ द्यावी.
डॉ. सचिनकुमार पटेल , मुख्याधिकारी