पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्याबाबतच्या चर्चा सुरू झाली आहे. पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते अशी मागणी करत असतात. मात्र याबाबत महायुतीचे घटक पक्ष असलेले भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या एकत्रित बैठकीत या दोन्ही लोकसभा मतदार संघातून कोणत्या मित्र पक्षाचा उमेदवार निवडणूक लढविणार, याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी (दि.6) पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आता या दोन्ही लोकसभा मतदार संघांमध्ये कोणत्या पक्षाचा निवडणूक लढविण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तर महायुतीच्या जास्तीतजास्त जागा निवडून आणण्यावर आमचा भर असणार आहे, असे ही ते म्हणाले.
दरम्यान, आतापर्यंत कट्टर समर्थक असलेले संजोग वाघेरे यांच्या शिवसेनेत (उबाठा) प्रवेश करून मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यास अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
गेली तीन -चार दिवसांपासून फेसाळणार्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले असता, ते म्हणाले की, याबाबत मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्यांना हे प्रदूषण रोखण्याबाबतच्या सूचना करणार आहे. मात्र वारंवार तक्रार करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जुजबी कारवाई करत असल्याची बाब निदर्शनास आणून द्दिल्यानंतर, याबाबत नागरिक न्यायालयात जनहित याचिका दाखल करू शकतात, असे ते म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सहकार चळवळीवर केलेल्या टिकेबद्दल बोलतना ते म्हणाले की, राज ठाकरेंनी किती सहकारी संस्था उभ्या केल्या आहेत?
मी सहकार चळवळीतून राजकारणात आलेला कार्यकर्ता आहे. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे 32 वर्षे प्रतिनिधित्व केले आहे. आज ती राज्यातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखली जात आहे, असे सांगत माझ्या विचारांनी चालणार्या बहुतेक सर्वच सहकारी संस्था चांगल्या चालल्या असल्याची बाब त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 25 हजार कोटींचा घोटाळ्याचा आरोप झालेली ही बँक आज 600 कोटींच्या नफ्यात आहे. काही बँकांकडून चुका होत असतील; मात्र सर्वांनाच एका माळेत मोजण्याचे कारण नाही, असेे ते म्हणाले.