पिंपरी (प्रतिनिधी) – मावळ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत उमेदवारी मिळविण्यासाठी अनेक इच्छुकांची चढाओढ पाहायला मिळत आहे. कट्टर कार्यकर्त्यांची फळी, उद्धव ठाकरे यांच्याविषयीची भावनिक लाट, महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांच्या मतांची बेरीज पाहता उमेदवारी मिळाली तर विजयाचा मार्ग सुखकर होईल, असे राजकीय गणित इच्छुक उमेदवार मांडत आहेत. ‘राजकीय स्पेस’ ओळखून संजोग वाघेरे, संदीप वाघेरे यांच्यासह अनेकांनी वरिष्ठ नेत्यांशी जवळीक वाढवली आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे यांना मानणारा शिवसैनिकांचा मोठा वर्ग आहे. राज्यात महाविकास आघाडीत खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शेतकरी कामगार पक्षासह इतरही मित्र पक्ष सोबत आहेत. त्याचा फायदा मावळमध्ये होऊ शकतो. हे हेरून भाजपाचे माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दरम्यानच्या काळात राजकीय वातावरण बदलल्याने सध्या त्यांनी संयमाची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले संजोग वाघेरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवबंधन बांधून आपल्या उमेदवारीचा मोकळा केला आहे. वाघेरे गाववाले असल्याने पिंपरी, चिंचवड आणि मावळमधून मोठे मताधिक्य मिळेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर रायगडमधील पनवेल, कर्जत आणि उरण मतदारसंघातील महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचा देखील फायदा होईल असे आडाखे बांधले जात आहेत. राज्यात राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार, शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि काॅंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचे दौरे वाढल्यास या मतदारसंघात सकारात्मक वातावरण निर्माण होण्याची इच्छुकांना अपेक्षा आहे.
अनंत गीते यांच्या नावाचीही चर्चा..
संजोग वाघेरे, संदीप वाघेरे यांच्यासोबतच माजी खासदार अनंत गीते यांनी देखील मावळ लोकसभेमधून लढण्याबाबत इच्छा व्यक्त केल्याची चर्चा होती. पक्षाकडे योग्य नेतृत्वाचा अभाव असल्याने त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती. रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश असल्याने त्याचा फायदा होईल. तसेच पिंपरी, चिंचवड आणि मावळमधील मतदार आपल्या सोबत राहतील. त्यामुळे विजयाचा मार्ग सुखकर होऊ शकतो, असा अंदाज असल्याचे बोलले जात होते. दरम्यानच्या काळात खासदार सुनील तटकरे भाजपासोबतच्या आघाडीत गेल्याने गीते यांचा रायगडमधून लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मावळचा दावा सोडून ते रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे.
महायुतीतील अस्पष्टतेचा फायदा ?
मावळ लोकसभेच्या जागेवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार गटाने दावा सांगायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीची ताकद या मतदारसंघात अधिक असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आमदार सुनील शेळके, अण्णा बनसोडे यांच्या दाव्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री शिंदे यांचे समर्थक खासदार श्रीरंग बारणे हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, जागा वाटपाचा तिढा निर्माण झाल्याने ही जागा कोणाला जाणार हे अद्याप निश्चित नाही. महायुतीच्या या गोंधळाचा फायदा महाविकास आघाडीला होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.