- निसर्ग चक्रीवादळ : मावळात नुकसानग्रस्तांना 23 कोटी 65 लाख रुपये
- आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
- उर्वरित नुकसानग्रस्तांना बॅंक खात्यावर रक्कम जमा होणार
वडगाव मावळ – चार महिन्यांपूर्वी मावळात आलेल्या निसर्ग चक्रीवादळात अनेक नागरिकांच्या घरांचे व शेतकऱ्यांच्या पिकांचे व पशुधनाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर मावळातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर मदत मिळावी, यासाठी आमदार सुनील शेळके यांनी पाठपुरावा करून मावळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 23 कोटी 65 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळवून दिली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या निसर्गचक्री वादळाचा फटका मावळ तालुक्याला बसला होता. या चक्रीवादळात तालुक्यातील सुमारे 6 हजार 924 घरांचे नुकसान झाले होते. 10 जनावरे दगावली होती. तर 221 फळबागांचे, 79 शेतकऱ्यांच्या भाजीपाला पिकांचे नुकसान झाले होते. या चक्रीवादळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आमदार सुनील शेळके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेऊन तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मावळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे शासकीय कर्मचाऱ्यांनी तातडीने पंचनामे करून शासनास सादर केले होते.
मावळातील 7 हजार 234 शेतकऱ्यांना 23 कोटी 65 लाख 35 हजार 265 रुपयांची नुकसान भरपाई गुरुवारी (दि. 8) देण्यात आली आहे. या वेळी काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आमदार शेळके यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले आहेत. व अन्य नुकसानग्रस्तांना त्यांच्या बॅंक खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात येणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार सुनील शेळके यांनी महाविकास आघाडी सरकारचे आभार व्यक्त केले.
या वेळी यावेळी प्रांत संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, माजी सभापती विठ्ठल शिंदे, पुणे जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्ष सचिन घोटकुले, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, महादू उघडे, कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे, नारायण ठाकर, अंकुश आंबेकर, सुदाम कदम, कैलास गायकवाड उपस्थित होते.
भाजप सरकारच्या तुलनेत महाविकास आघाडीच्या सरकारने तीन पट जास्त नुकसान भरपाई नुकसानग्रस्ताना दिली असून, घर पडझडीला दीडपट भरपाई दिली आहे.
– सुनील शेळके, आमदार, मावळ.