राजगुरूनरातील महाचर्चासत्रात बाळासाहेब भांडे यांचा विश्वास
राजगुरूनगर- महाविकास आघाडीचे सरकार मातंग समाजाला न्याय देईल, असा विश्वास शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांनी व्यक्त केला.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त राष्ट्रीय बहूजन विकास महासंघाच्यावतीने पुणे जिल्ह्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचे राजगुरूनगर येथे महाचर्चासत्राचे आयोजन केले होते, त्यावेळी भांडे बोलत होते. यावेळी आरपीआय आघाडीचे प्रदेश अध्यक्ष हनुमंतराव साठे, ज्येष्ठ साहित्यिक सोपानराव खुडे, राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचे उपाध्यक्ष अनिल शिंदे, ज्येष्ठ साहित्यिक सुरेश पाटोळे, सेवानिवृत्त पर्यवेक्षक दादाभाऊ आल्हाट, कस्टमचे सेवानिवृत्त अधिकारी जगन्नाथ आल्हाट, भाऊसाहेब वायदंडे, राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचे प्रवक्ते काशिनाथ आल्हाट, सुनिल आल्हाट, रतनताई वैराट, सुरेश पवार संतोष पंचरस, सुभाष नेटके, संदीप नेटके, पांडुरंग नेटके, अविनाश नेटके, गुलाब नेटके भरत वैराग, आत्माराम कसबे, वसंत साळवे, भरत गालफाडे, सखाराम गायकवाड, अंकुश पाटोळे, अनिल शिंदे, वसंतराव लोंढे व पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.
बाळासाहेब भांडे म्हणाले, स्वातंत्र्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 16 ऑगस्ट 1947 रोजी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी शासनदरबारी बहूजनांचा भव्य मोर्चा काढून बहूजन समाजाच्या न्याय हक्कासाठी लढले होते. तेव्हापासून आजपर्यंत न्याय हक्कासाठी मातंग समाजाची लढाई सुरू आहे. मातंग समाज आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या अतिशय मागास असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवानिवृत्त वनपाल अधिकारी वसंतराव लोंढे यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचे उपाध्यक्ष अनिल शिंदे यांनी तर पांडुरंग नेटके यांनी आभार मानले.
- महाराष्ट्रातील मातंग समाज मागास असण्याचे मुख्य कारण म्हणजे मातंग समाज शिक्षणापासून वंचित राहिला हे आहे. समाज अंधश्रद्धेच्या आहारी गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मातंग समाजने शिक्षणाविषयी जागरूक होऊन शिक्षणाची कास धरली पाहिजे तरच मातंग समाजाचा विकास होईल.
– सोपान खुडे, ज्येष्ठ साहित्यिक