आळंदी – आळंदी नगर पालिकेवर 2017 भाजपची एकहाती सत्ता आली; मात्र भाजपने आजवर केवळ पोकळ आश्वासनाशिवाय आळंदीकरांना काहीच दिले नाही. भाजप फक्त सत्तेसाठी आणि पदे मिळविण्यासाठी “गुडघ्याला बाशिंग बांधून’ तयार आहे; मात्र त्यांना विकासाचे कोणतेही सोयरसुतक नाही, असे आळंदीकर बोलत आहेत. आळंदीतील जवळपास 80 टक्के मतदार भाजपवर जाहीरपणे नाराजी व्यक्त करीत आहेत.
…शुद्ध पाणी काही आले नाही
नगराध्यक्षांसह 11 भाजप, 6 शिवसेना व 2 अपक्ष असे पक्षीय बलाबल पालिकेत असून एकहाती सत्ता असलेल्या भाजपने आजवर आळंदीकरांना विकासाचे फक्त गाजर दाखवले आहे. आळंदीचा पाणीप्रश्न ज्वलंत असून निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील प्रथम आळंदीकरांचा पाणीप्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दिले होते; मात्र त्यांचा सत्तेतून पायउतार झाला, पण आळंदीकरांना शुद्ध पाणी काही मिळाले नाही.
आळंदीत तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत विकासाची कामे 80 टक्के पूर्ण झाले असून, या कामांकडे मुख्याधिकारी तसेच सत्ताधारी भाजप व विरोधकांचे देखील लक्ष नसल्याने कित्येक ठिकाणी चुकीची व निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. पुणे-आळंदी रस्ता रुंदीकरणात झोपडपट्टी अडथळा ठरत आहे.
नवीन, जुना पूल, वाय जंक्शन, देहू फाटा ते काटेवस्तीपर्यंत रस्ता रुंदीकरण वादाच्या भोवऱ्यात असल्याने या मार्गावर नियमित वाहतूककोंडी होत आहे. आळंदीत स्वच्छतेचा देखील बोजबारा वाजला असूनही सत्ताधाऱ्यांना त्याकडे लक्ष देण्यास वेळ नाही. शहरात बड्या धेडांची अनधिकृत बांधकामे वाढली आहेत. यात स्थानिक पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे.
तर शहरातील पदपथांवर दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत असूनही ठोस अशी कारवाई होत नाही. भाजी मंडईचा प्रश्न प्रलंबित असून तो देखील सोडवला जात नाही. सध्या असणारी भाजी मंडई ही ग्रामीण रुग्णालयालगत असून या ठिकाणी अनेक समस्या आहेत. अतिक्रमणे वाढली आहेत रुग्णवाहिका येण्या-जाण्यासही जागा मिळत नसल्याने पालिकेचे अतिक्रमण विभाग करते तरी काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
तीन उपनगराध्यक्ष झाले, प्रश्न “जैसे थे’
भाजपचे दर सहा महिन्यांनी उपनगराध्यक्षपदी एकाला संधी देण्याचे ठरले असून प्रथम प्रशांत कुऱ्हाडे, सागर भोसले, सचिन गिलबिले यांना प्रत्येकी सहा महिन्याची संधी देण्यात आली. मात्र, त्यांच्या काळात विकासाचे एकही काम झाले नाही, आता मंगळवारी (दि. 18)या पदावर मीरा पाचुंदे या विराजमान झाल्या असून त्यांच्या कार्यकाळात तरी काही प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा आळंदीकरांना आहे.
रस्त्यावर केवळ राजकारण
मरकळ रस्त्यावरील माउली पार्क येथे आजवर रस्ता झालेला नाही. त्यामुळे आता येथील रहिवासी पार्क सोडून जाण्याच्या तयारीत आहेत. कारण गेली कित्येक वर्षांपासून रस्ता केला जात नाही, यात मोठे राजकारण शिजत आहे. जो-तो यातून अंग काढून घेत आहे; मात्र या राजकारणाचे मूळ कशात आहे हे कोणीच शोधत नाही. यावर भाजप म्हणतोय त्या प्रभागाचा कोण नगरसेवक असेल त्याने तो रस्ता त्याच्या पद्धतीने करून दाखवावा.