तृतीयपंथीचे जग रहस्यमय आहे, त्यांच्याशी संबंधित काही रहस्ये जगासमोर कधी प्रकट होत नाहीत. तुम्हाला हे माहित आहे का, की तृतीयपंथीदेखील लग्न करतात. हे जाणून आश्चर्य वाटेल की त्यांचे लग्न आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीशी होत असते. तृतीयपंथी नेमके कोणाशी लग्न लग्न करतात, हे जाणून घेणे खूप रंजक आहे.
तृतीयपंथीचा देव अर्जुन आणि नाग कन्या उलूपी यांचा पुत्र इरावन किंवा अरावन म्हणून ओळखला जातो. पौराणिक कथांनुसार, नपुंसक अथवा तृतीयपंथीयांना एक स्वतंत्र आणि दिव्य स्थान देण्यात आले आहे. या तृतीयपंथी व्यक्तींच्या प्रथा वेगळ्या आणि ‘हटके’ आहेत. अशीच एक प्रथा तामिळनाडूमधील खेड्यात आहे जिथे आजही एक सण साजरा केला जातो. ज्यामध्ये सर्व तृतीयपंथी उत्साहाने भाग घेतात. तामिळनाडूमधील विलीपुरममधील कुवागम या गावात भगवान इरावनचा एक खास सण आहे जिथे सर्व तृतीयपंथी त्याच्याशी लग्न करतात आणि दुसर्या दिवशी विधवा होतात.
लग्नाच्या दुसर्या दिवशी इरावनची मूर्ती शहरभर फिरविली जाते. त्यानंतर मूर्ती तोडण्यात येते. यानंतर सर्व तृतीयपंथी आपला सर्व शृंगार उतरवून विधवेप्रमाणे शोक करतात. आता आम्ही तुम्हाला त्यामागील रहस्यही सांगतो. महाभारताच्या युद्धाच्या वेळी पांडवांमध्ये कालीमातेची पूजा केली जात होती आणि या पूजेमध्ये एका राजकुमाराचा बळी द्यावा लागणार होता. या कामासाठी कोणताही राजपुत्र पुढे आला नाही. त्यावेळी इरावन समोरून आला आणि म्हणाला की मी या कामासाठी तयार आहे. इरावन यांनी या कामासाठी एक अटदेखील घातली की लग्न झाल्याशिवाय तो बलिदानाला तयार होणार नाही.
फक्त एका दिवसासाठी राजकुमार इरावनशी कोण लग्न करेल आणि दुसर्याच दिवशी विधवा होईल, याची पांडवांना चिंता लागली. अतिशय कठीण परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने या समस्येचे निराकरण केले आणि स्वत: मोहिनीच्या रुपात तिथे आले. मोहिनीचे रूप धारण करून श्रीकृष्णाने इरावानशी लग्न केले आणि दुसर्याच दिवशी इरावानचा बळी देण्यात आला. यानंतर मोहिनी रूपातील श्रीकृष्णानेही विधवा म्हणून शोक केला. इरावनला आपला देव मानलेले सर्व तृतीयपंथी या घटनेची आठवण म्हणून ही प्रथा पाळतात.