आपल्या घरात लग्नकार्य, मंगलकार्य घडले असेल किंवा देवीच्या कृपेने आपल्याच एखाद्या नवसाची पूर्तता झाली असेल तर त्याची कृतज्ञता, नवस फेडणी म्हणून घरात देवीचा जागरण गोंधळ घालण्याची एक सांस्कृतिक परंपरा आजही आपल्याकडे आवर्जून जपली जाताना पाहावयास मिळते. त्या धार्मिक कार्यासाठी देवीच्या ज्या स्तुतिपाठकांना, तिच्या पराक्रमाचे गोडवे गाणाऱ्या आणि बोधात्मक जागरण घडवून आणणाऱ्या, लोकांना बोलावले जाते त्यांना “गोंधळी’ असे म्हणतात.
या गोंधळी लोकांची वेशभूषा साधी म्हणजेच चुस्तपायजमा, धोतर, अंगात पायघोळ झगा, लांब सदरा, कमरेस एक बांधलेले लाल किंवा केशरी रंगाचे उपरणे अशी असते टाळ आणि संबळ हे या लोकांचे मुख्य वाद्य. गोंधळी लोक हे स्वत:स आम्ही देवीचे सेवेकरी आहोत, असे म्हणवतात. त्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनातूनच त्यांचा चरितार्थ चालत असतो. देवीचा गोंधळ घालणे हा एक पारंपरिक कुलाचाराचा प्रकार आहे. त्यासाठी या गोंधळी लोकांना खास आमंत्रित केले जाते. ते एक विशिष्ट प्रकारची देवीची पूजा मांडतात. त्या समोर नवदांपत्यास आणि घरातील मंडळींना बसवतात. प्रथम देवीची पूजा केली जाते. त्यानंतर देवीचा गोंधळ सुरू केला जातो.
आता गोंधळ घालतात म्हणजे तरी काय करतात? याचे उत्तर असे की विविध शक्ती स्थानावरील आदिशक्तीस आवाहन करून तिला त्या पूजेसाठी, भक्तभाविकांवर कृपा करण्यासाठी आमंत्रित करतात. या संदर्भातील ही रचना निश्चितच बोलकी आहे. कशी ते पाहा-
कोल्हापूरच्या अंबाबाई, गोंधळाला ये। तुळजापूरच्या माय भवानी, गोंधळाला ये।।
माहूरगडच्या रेणुका माते, गोंधळाला ये। सप्तशृंगीच्या दुर्गा देवी, गोंधळाला ये।।
उदे गं अंबामाते आई, गोंधळाला येऽऽ
या आणि अशा प्रकारची आवाहने करून त्या त्या घराण्याच्या कुलदेवतेसहित अन्य मान्यवर देवींना या कार्यासाठी आमंत्रित केले जाते. गोंधळी लोकांना खडा आवाज, विशिष्ट चाली, त्या स्तुति स्तवनास दिलेली संबळ या वाद्याची जोड, सोबत टाळ, दिमडी, ह्यांचा साधलेला ठेका, ह्यामुळे हा गोंधळ ऐकण्यातही एक वेगळीच मजा आणि आनंद मिळतो. गोंधळाची सांगता पोत पाजळून हाती दिवट्या नाचवीत सांबळ वाजवीत मोठ्या भक्तिभावाने आरती करून केली जाते. या गोंधळी लोकांना पूर्वी राजदरबारी मानाचे स्थान दिले जात असे. आजही समाजात त्यांना एक मानाचे आणि प्रतिष्ठेचे असे स्थान आहेच.