‘पिफ’मध्ये चित्रपटांचे ओटीटी प्लॅटफॉर्म व यशस्वी मार्केटिंग या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन
पुणे : मराठी भाषिक प्रेक्षक मल्याळम चित्रपट सबटायटल्सवरून आवडीने पाहतो, अशाच पद्धतीने इतर भाषेतील प्रेक्षक मराठी चित्रपटाकडे वळाले पाहिजेत. यासाठी मराठी निर्माते, दिग्दर्शक यांनी सर्वसमावेशक चित्रपटांची निर्मिती करावी जेणेकरून मराठी चित्रपट ‘युनिव्हर्सल’ होतील, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले.
१८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा अंतर्गत आज ‘चित्रपटांचे ओटीटी प्लॅटफॉर्म व यशस्वी मार्केटिंग’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होते. पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महामंडळाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे या वेळी उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सहयोगाने सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक दिग्पाल लांजेकर, चित्रपट वितरण क्षेत्रातील तज्ज्ञ अजय फुटाणे यांच्याशी या वेळी विनोद सातव यांनी संवाद साधला.
या वेळी बोलताना डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, “ओटीटी प्लॅटफॉर्म हा सध्याच्या काळातील एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे. खास करून निर्मात्यांसाठी रेव्हेन्यू जनरेशनसाठी एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म म्हणून तो पुढे येत आहे. मात्र आपले चित्रपट चित्रपटगृहात टिकावेत यासाठी दिग्दर्शक व निर्मात्यांनी चित्रपटाची कथा, व्हिज्युअलल इलेमेंट यांकडे देखील लक्ष दिले पाहिजे. आपले चित्रपट हे नाटकासारखे दिसता कामा नये हा विचारही तितकाच महत्त्वाचा आहे. मराठी प्रेक्षक हा अजूनही कथा किंवा त्या चित्रपटाच्या कंन्टेंटवर जाणारा आहे हे या वेळी लक्षात घ्यायला हवे.”
चित्रपटाच्या मार्केटिंग विषयी विचारले असता दिग्पाल लांजेकर म्हणाले, ऐतिहासिक चित्रपट करण्याचा प्रयत्न आपल्याकडे फारसा केला जात नाही याची अनेक कारणे आहेत. मात्र अशा पद्धतीचे चित्रपट लिहित असतानाच त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजिचा विचार केला गेला पाहिजे तुमच्या डोक्यात चित्रपटाविषयी अनेक क्रिएटिव्ह गोष्टी असतात मात्र मार्केटिंगच्या दृष्टीने त्या बरोबर असतीलच असे नाही. त्यामुळे मार्केटिंगचा विचार करूनच चित्रपट लिहिला जावा. याशिवाय आपण ‘क्लास’ बरोबरच ‘मास’कडे जाण्याच्या नादात आपली पातळी उतरायचा प्रयत्न करण्याची गरज नाही. या उलट ‘मास’ची पातळी उंचावण्याची जबाबदारी देखील निर्माते आणि दिग्दर्शकाची आहे.”
वितरण व मार्केटिंग हा चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र हे महत्त्व आज अनेकांना समजत नाही. चित्रपट तयार झाल्यावर त्याच्या मार्केटिंग व वितरणाकडे वळण्यापेक्षा आधी सहा महिने त्याच्या विचार व्हायला हवा. चित्रपट लिहितानाच ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी तयार असायला हवी जेणेकरून चित्रपटाच्या प्री प्रोडक्शनमध्ये त्याचा समावेश व्हावा. टिव्ही, वर्तमानपत्रे यांमधील जाहिराती म्हणजे मार्केटिंग नव्हे हे देखील लक्षात घ्यायला हवे.
तुमचा प्रेक्षक कोण आहे हे जाणून त्याचे मार्केटिंग करण्यावर भर दिला जावा. मागील दोन वर्षांचा विचार केला तर २०१८ साली एकूण ११९ मराठी चित्रपटांपैकी केवळ १७ चित्रपट हे १ कोटी रुपयांचा गल्ला जमविण्यात यशस्वी झाले. तर २०१९ मध्ये ११३ पैकी केवळ १० चित्रपटांना हे जमले. या यशस्वी चित्रपटांचा विचार केला तर त्यांच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे ते शक्य होऊ शकले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, असे मत यावेळी अजय फुटाणे यांनी मांडले.
मराठी चित्रपटांच्या वितरणासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ हे सातत्याने प्रयत्न करीत असून राज्य सरकारशी बोलून तालुक्याच्या ठिकाणी काही चित्रपटगृहे याशिवाय टूरिंग टॉकीज अशा संकल्पनांवर चर्चा सुरु आहे, अशी माहिती या वेळी मेघराज राजेभोसले यांनी दिली. आपल्याकडे चित्रपटगृहे, त्यासाठी आवश्यक प्राथमिक बाबींची वाणवा आहे. ग्रामीण भागात ही परिस्थिती आणखी बिकट होते, हेच लक्षात घेत महामंडळ या सुविधांच्या सुधारणेसाठी पाठपुरावा करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
आज कोणत्याही चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्याचा ट्रेलर महत्त्वाचा असतो. ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला तर चित्रपटाची योग्य प्रसिद्धी होते. हिंदी चित्रपट सृष्टीला ट्रेलरचे हे महत्त्व समजले असले तरी मराठी निर्मात्या, दिग्दर्शकांना ते अद्याप उमगले नसल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे आटा मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांनी आपल्या ट्रेलरकडे लक्ष द्यायला हवे असे यावेळी विनोद सातव यांनी नमूद केले.
या शिवाय चित्रपटांचा इन्श्युरन्स या विषयावर द न्यू इंडिया एश्युरन्स कंपनीच्या मिनाक्षी देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. चित्रपटाशी निगडीत इन्श्युरन्सच्या अनेक पर्यायांची माहिती त्यांनी यावेळी दिली.