कबीर बोबडे
नगर – मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी व भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर 1 जानेवारी ते 15 जानेवारी हा कालावधी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, राज्यातील केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व संस्थांना, शाळांना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्याचे आदेश देण्यात आले. गेल्या पाच वर्षात अशा सप्ताहानी वैतागलेल्या शाळांचे नेमके महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष झाले. जिल्ह्यात बहूतांश मराठी शाळांमधून मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा झाला नाही.
मराठी भाषा केवळ महाराष्ट्राची भाषाच नसून महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि या भाषेच्या – संस्कृतीच्या संवर्धनासाठी आणि सन्मान करण्यासाठी राज्य शासनाने अनेक अभिनव उपक्रम हाती घेतले. याच धर्तीवर राज्यामध्ये मराठी भाषेचा राजभाषा म्हणून सार्वत्रिक वापर करण्याच्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी भाषा पंधरवड्यात विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करावे. त्यामध्ये जास्तीत जास्त व्यक्तींचा सक्रिय सहभाग असावा.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असे फलक सर्व कार्यालयांनी लावावेत, असे राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले होते. भाषेच्या संवर्धनासाठी प्रत्येक शाळेने देखील पंधरवडा साजरा करणे अनिवार्य आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालय, महामंडळे, सर्व खाजगी व सरकारी बॅंका, सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे – महाविद्यालयांनी पंधरवडा साजरा करणे आवश्यक आहे.
त्या दृष्टीने सर्व कार्यालय प्रमुखांनी या पंधरवड्यात विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करणे अनिवार्य होते. विशेष म्हणजे या पंधरवड्यात साजरा होणाऱ्या सर्व कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त व्यक्तींचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक होते. सर्व कार्यालयात शाळांमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा असे फलक लावणे आवश्यक होते.
याबाबत आदेश असूनही जिल्ह्यातील शासकीय कार्यालय व शाळांमध्ये अशा प्रकारचे फलक जिल्हा न्यायालय सोडले तर अन्य कोठेही आढळून आले नाही. 15 जानेवारीपर्यंत हा पंधरवडा साजरा करणे आवश्यक आहे. गेल्या दहा दिवसात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा केवळ कागदावरच राहिला. विशेष म्हणजे अधिकाऱ्यासह मुख्याध्यापकांना देखील हा पंधरवडा साजरा करण्यामध्ये कुठली रुची असल्याचे दिसत नाही. परिणामी, शासकीय कार्यालयाबरोबरच मराठी शाळा मधून देखिल मराठी भाषा पंधरवडा हद्दपार झाल्याचे दिसत आहे.
भाषा संवर्धनाला शाळांचीच दांडी !
सध्या भाषा संवर्धन पंधरवडा चालू आहे. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिनही साजरा करू. पण; तोही कागदावरच साजरा करू, असे वाटते. दक्षिणेकडील राज्ये आपापल्या भाषांसाठी जे करतात, त्यापैकी आपण काही करीत नाही. एकीकडे सरकारी कार्यालयातील कामे मराठीतूनच व्हावे असे आदेश असताना मराठी भाषिक कार्यालयांमध्ये मराठीला गुंडाळण्याचे प्रयत्न होत आहेत. सर्व शाळा, महाविद्यालयांना मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्याचे आदेश आहे. मात्र या आदेशाला शाळा महाविद्यालयांनी दांडी मारून केराची टोपली दाखवली जात आहे.