Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात आता चांगलाच तापला आहे. राज्यभरात सरकारविरोधात मराठा बांधव आक्रमक होताना दिसून येत आहे. मात्र असे यातना मराठा आरक्षणासाठी अनेकांनी टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. मराठवाड्यात एकाच दिवशी तिघांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. जालना येथील अंतरवाली टेंभी गावातील शिवाजी किसन माने, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथील गणेश काकासाहेब कुबेर आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील देवजना लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर यांनी मराठा आरक्षणासाठी टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे.
जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी गावात सुरू असलेल्या साखळी उपोषणात सहभागी असलेल्या मराठा तरूणाने आत्महत्या केली आहे. उपोषण सुरु असतांना मंडपातून उठून थेट घर गाठत दरवाजाच्या कोंड्याला दोरी लावून गळफास घेत या तरुणाने आत्महत्या केली. शिवाजी किसन माने असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. सरकारला वेळ देऊनही मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळत नसल्याने मुलांचे शिक्षण करू शकत नाही, या नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.
तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील आपतगाव येथे एका मराठा तरुणाने गुरुवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश काकासाहेब कुबेर असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. तसेच. “जोपर्यंत आरक्षण भेटत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका,” असा मजकूर आत्महत्या करण्यापूर्वी त्याने पाटीवर लिहून ठेवला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले (चार व सहा वर्षाची ) आई-वडील व भाऊ असा परिवार आहे.
त्यासोबत “मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळत नसल्याने आत्महत्या करीत आहे, “अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवत एका युवकाने शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील देवजना येथे घडली. मयत युवकाचे नाव लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर असे आहे. आरक्षणासाठी सरकार वेळ लावत आहे. त्यामुळे मराठा समाजातील तरूणांमध्ये नैराश्येचे वातावरण आहे. या नैराश्यातूनच देवजना शिवारातील शेतामधील एका झाडाला लहू उर्फ कृष्णा कल्याणकर याने गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान, आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला असून आजचा त्यांचा उपोषणाचा ३ दिवस असून ते आपल्या मागणीवर ठाम असल्याचे म्हटले आहे.