सोलापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी आरक्षण देण्यासंबंधी धोरण स्पष्ट केले आहे. याद्वारे त्यांनी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील याची मुख्य मागणी पूर्ण केली. त्यामुळे आता जरांगे यांनी जास्त विषय ताणू नये, अशा शब्दांत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे यांना उपोषण सोडण्याची विनंती केली आहे. ते सोलापूरमध्ये बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी बुधवारीच कुणबी – मराठा आरक्षणासंबंधी धोरण स्पष्ट केले. मराठवाड्यातील सर्व गावे पूर्वी निजाम संस्थानात होती. त्यामुळे सरकारने “कुणबी’ असल्याचे पुरावे दाखवणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली आहे. पण असे करताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याची आमचा कोणताही हेतू नाही, असेही विखे पाटील म्हणाले.
तसेच, त्यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदी असताना मराठा आरक्षणासाठी काय केले? यासंबधीची एक श्वेतपत्रिका सरकार काढणार आहे. ती निघाल्यानंतर मराठा बांधवांना वस्तुस्थिती समजेल आणि विरोधकांची लक्तरे वेशीवर टांगली जातील, असे ते म्हणाले.