मोठ्या कचरा प्रकल्पाची गरज : नागरिकांची मागणी
सोरतापवाडी- हवेली तालुक्यातील मांजरी, शेवाळेवाडी, कदमवाकवस्ती, लोणीकाळभोर, थेऊर, कुंजीरवाडी, नायगाव, उरूळी काचंन, आळंदी म्हातोबाची ग्रामपंचायत हद्दीत कचऱ्याची प्रचंड समस्या जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा वेळोवेळी उचलला जात नसल्याने त्याचा परिणाम म्हणून दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. पूर्व हवेलीत हजारो एकर गायरान जमीन आहे. त्यात एक मोठा कचरा प्रकल्प होऊ शकतो. मात्र, राजकीय नेते आणि प्रशाकीय अधिकाऱ्यांची मानसिकता प्रबळ असण्याची गरज आहे.
मांजरी हद्दीत सोलापूर महामार्गावर मांजरी बाजाराच्या अलीकडे कित्येक दिवस कचरा उचलला गेला नाही. त्यामुळे महामार्गावर सर्वत्र कचराच कचरा दिसतो. परिसरातील नागरिक कचरा टाकून देत असल्याचे दिसून येते. तेथे दोन कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत. नागरिक सौजन्य दाखवत नाही. स्वतःच्या घरातील कचरा गोळा करायला दहा ते पंधरा मिनिटे घालवतात. पण तोच कचरा टाकताना एक मिनिट न थांबता चालू गाडीतच मागे बसलेली महिला किंवा पुरूष रस्त्यावर फेकून देतात. राजश्री शाहू महाराज बॅंकेसमोर व मांजरी येथील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्राजवळील ओढ्याजवळ कचरा साठलेला आहे. द्राक्ष बागेजवळ सुध्दा कचरा टाकला जात आहे. हा महामार्ग की कचरा मार्ग हेच कळत नाही. कचऱ्यातून महामार्ग शोधावा लागत आहे. इतकी वाईट परिस्थिती महामार्गाची झाली आहे.
कदमवाकवस्ती हद्दीत कचऱ्याच्या प्रश्नाची तीव्रता जास्त आहे. कदमवाकवस्ती हद्दीतील पालखी तळाच्या दोन्हीही रस्त्यावर व पालखी तळात देखील कचरा टाकला जात आहे. पालखी तळ का कचरा तळ हेच कळत नाही. लोणी स्टेशन परिसरात तशीच परिस्थिती आहे. लोणी व कदमवाकस्ती हद्दीतील ओढ्याशेजारी नागरिक रस्त्यावर बिनधास्त कचरा टाकत आहेत. प्लॅस्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे तो त्यातच कुजत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. अतिशय कुबट, सडलेल्या पदार्थाचा वास त्या भागातून जाणाऱ्या नागरिकांना त्रासदायक ठरत आहे.
लोणी येथील कचरा उचलून तो नदीच्या शेजारी असलेल्या ग्रामपंचायतीच्या जागेत टाकला जात आहे. कुंजीरवाडी येथील कचरा आळंदी रस्त्याच्या कडेला असलेल्या शाळेच्या भिंतीच्या कडेला टाकला जात आहे. नायगाव येथील कचरा गायरानात टाकत आहेत. सोरतापवाडी येथील कचऱ्याचे योग्य नियोजन सरपंच सुदर्शन चौधरी यांनी केले आहे. त्यासाठी त्यांनी स्वत:ची एक एकर जागा त्यासाठी उपलब्ध करून दिली आहे. ऊरूळी कांचन येथील कचरा गोळीबार मैदानात टाकला जात आहे. ठराविक ग्रामपंचायत सोडल्या तर पूर्व हवेलीतील ग्रामपंचायती कचरा प्रश्न सोडवण्यास अपयशी ठरल्या आहेत. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. फक्त पूर्व हवेलीसाठी एक मोठा कचरा प्रकल्प राबविण्याची गरज आहे.
- कचरा प्रकल्पासाठी शासनाकडे जागा मागितली होती. स्थानिक कंपन्याशी चर्चा करून त्यांच्या एसआर फंडातून कचरा प्रकल्प करून देण्यासाठी कंपन्या तयार आहेत. परंतु जागेअभावी हा प्रकल्प रखडला आहे. जागेची मागणी पीएमआरडीकडे केली आहे. त्यासाठी पीएमआरडीचा डेव्हलपमेंट प्लॅन तयार होत आहे. यामध्ये ग्रामपंचायतीला जागा मिळणार आहे. कचऱ्याचा आजार जुनाच असून त्यावर कायमस्वरूपी रामबाण उपाय करण्याचे काम तत्कालीन आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नेतृत्वाखाली सुरू होते. त्यांनी संबंधित खात्याला सूचना दिल्या आहेत. लवकरच ग्रामपंचायतीला जागा मिळणार आहे.
– गौरी गायकवाड, सरपंच, कदमवाकवस्ती.