मुंबई – राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सभागृहात अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीचे रक्षक असाल तर राज्याचे अधिवेशन एका आठवड्याने वाढवले पाहिजे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. कमीत कमी एक आठवडा कालावधी वाढवला पाहिजे. कारण आमच्याकडे भरपूर कामकाज आहे.
या सभागृहाला योग्य आणि समर्पक न्याय द्यायचा असेल तर एक आठवडा हे अधिवेशन वाढवलेच पाहिजे, असे मुनगंटीवार म्हणाले. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही त्यांनी भाष्य केले. आज त्यांनी त्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. आम्ही विरोधी पक्ष बसणार आहोत. त्यावर आमचा पुढील निर्णय घेणार आहोत, असे त्यांनी सांगितले.
आज राज्यात अनेक रोजंदारी कामगारांचे प्रश्न आहेत. धानाचा बोनस दिला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. करोनाच्या कालावधीत झालेला भ्रष्टाचार आहे. आरोग्य सेवेचे अपग्रेडेशन झाले नाही. मंत्रालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडत आहेत, असे अनेक विषय आहेत. पेपरफुटीसारखे घाणेरडे पाप या राज्यात होत आहे. त्यामुळे जनतेच्या मनात आक्रोश आणि रोष आहे. त्यामुळे हे लोकशाहीचे खरे रक्षक असतील तर अधिवेशन वाढवतील.
नाही तर नाही वाढवणार, असा हल्लाबोलही त्यांनी केला. नवीन निर्बंध लावण्याच्या आधी हाफकीन संस्था नवीन औषधे निर्माण करणार होती. आरोग्य भरती करण्यात येणार होती. या सर्व गोष्टींबाबत सरकार कुंभकर्णाच्या झोपेत असेल तर गैर आहे. निर्बंध लादलेच पाहिजेत. पण त्याआधी उपाययोजनाही केल्या पाहिजे, असेही त्यांनी सांगितलं.