मुंबई – प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी काल आत्महत्या केली. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत देसाई यांनी आपलं आयुष्य संपवलं. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरलेली आहे.पावसाळी अधिवेशनामध्ये देखील नितीन देसाई यांच्या आत्महत्येचा आणि एन डी स्टुडिओचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला. अशात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देसाई यांच्या बाबतचा धक्कादायक खुलासा केला आहे.
“नितीन देसाई हे माझे जवळचे मित्र होते. त्यांना अनेक लोकांनी ब्लॅकमेल केलं, असा गौप्यस्फोट जितेंद्र आव्हाडांनी केला. ब्लॅकमेल करणारे लोक मुंबई एमएमआरडीएशी संबंधित आहेत” असंही आव्हाड यावेळी म्हणाले. मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आव्हाडांनी देसाई यांच्याबाबतचा गौप्यस्फ़ोट केला.
नितीन देसाईंनी कधीही रस्त्यावर डेकोरेशन केलं नव्हतं परंतु आमच्या गणपतीला २५ वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांनी पहिल्यांदा रस्त्यावर डेकोरेशन केलं. असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले. “मागच्या तीन वर्षात नितीन देसाईंच्या ज्या आर्थिक उलाढाली झाल्या, त्या सर्व उलाढालींची चौकशी व्हायला पाहिजे. तसेच यादरम्यान त्यांच्या कुणा-कुणाशी भेटी झाल्या? या सगळ्याची देखील चौकशी केली पाहिजे.नितीन देसाईंना अनेकांनी ब्लॅकमेल केलं आहे. ते ब्लॅकमेल करणारे कोण आहेत? याचा शोध पोलिसांनी घ्यायला पाहिजे.” असंही आव्हाड यावेळी म्हणाले.
नितीन देसाईंना कुणी कुणी छळलं हे त्यांच्या जवळच्या मित्रांना माहिती आहे. त्यांच्या आत्महत्येशी गुजरातच कनेक्शन नाही,सगळं कनेक्शन मुंबईच्या एमएमआरडीएशी आहे. माझा कोणावरही रोख नाही परंतु पोलिसांनी व्यवस्थित शोध घ्यावा अशी मागणी देखील आव्हाड यांनी केली.