मुंबई – चार वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शनासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त करणारे नितीन चंद्रकांत देसाई यांचे अकाली निधन संपूर्ण सिनेसृष्टीसाठी चटका लावून जाणारे आहे. नितीन देसाई हे अनेक आठवड्यांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत असलयाचे बोलले जात आहे. याच कारणामुळे ते मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. अशात त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समोर येताच सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली आजच्या आहे.
या दिवसांत नितीन यांच्यावर सुमारे 252 कोटींचे कर्ज होते आणि त्याच्या वसुलीसाठी वित्तीय कंपन्यांनी स्थानिक प्रशासनासोबत कारवाई सुरू केली होती. असं बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, नितीन देसाई यांच्या कंपनी एनडी आर्ट वर्ल्ड लिमिटेडने 2016 आणि 2018 मध्ये ईसीएल फायनान्सकडून एकूण 185 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कोरोना कालावधीपूर्वीच त्याच्या पेमेंटमध्ये अडचणी येऊ लागल्या होत्या. जानेवारी 2020 मध्ये सुरू झालेल्या या समस्यांबद्दल नितीन चंद्रकात देसाई यांच्या काही जवळच्या मित्रांनाच माहिती होती.
“नितीन देसाई हे आर्थिक समस्यांचा सामना करत होते. त्यांनी माझ्याकडे मदत मागितली होती. बँकिंगच्या माध्यमातून इतर कर्ज फेडलं जावं अशी त्यांची इच्छा होती. कोविडनंतर त्यांचा स्टुडिओ बिझनेस बराच ठप्प झाला होता” अशी माहिती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे (FWICE) बी. एन. तिवारी यांनी एका इंग्रजी मीडियाशी बोलताना दिली.
देसाई यांच्या मृत्यूनंतर त्यांचा स्टुडिओ ज्या भागात आहेत तेथील स्थानिक आमदार महेश बालदी यांनी देखील त्यांच्या मृत्यूबाबत भाष्य केले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना बालदी म्हणाले,”आम्ही महिन्याभरापूर्वी भेटलो होतो. त्यांनी सांगितलं की आर्थिक अडचणीत आहे. परंतु नवीन चित्रपट शूटसाठी येणार आहेसगळं ठीक होईल असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला होता. पण त्याने आर्थिक अडचण काही दूर झाली नाही” अशी माहिती आमदार बालदी यांनी दिली.
नितीन देसाई यांच्या निधनाने सिनेसृष्टीत न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. देसाई यांनी आत्महत्या नेमकी का केली ? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र नितीन देसाई यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून लवकरच याबाबतची अधिकृत माहिती समोर येऊ शकते. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.