शेवगाव : करोना महामारीने सर्व जगाला वेठीला धरले. लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे, बाजारपेठा बंद असल्याने चलनाला ब्रेक लागला. सध्या केंद्र व राज्य सरकार, प्रशासन, विविध स्वयंसेवी, सेवाभावी संस्था , राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी, सोबतच सर्वांचे हात मदत कार्यात सैल सुटले आहेत .परिसरातील संत महंत, गडांचे अधिपती सुद्धा यात मागे राहिले नाहीत.
त्यामुळे एकेका घरात शासन ,प्रशासनाव्यतिरिक्तही अनेकांची वैयक्तिक मदत पोहच होत असल्याने मी एकटा नाही, अडचणीच्या काळात माझ्या सोबत विविध धर्माचे माझे भारतीय बांधव आहेत ही भावना मना-मनात रुजते आहे. ठायी ठायी भारतीय संस्कृतीचे माणुसकीचे दर्शन घडते आह.
शेवगाव पाथर्डी या परिसराला संत महंताची थोर परंपरा आहे. लॉकडाऊनमुळे देवस्थानात दर्शनापासून रोजच्या तसेच विविध उत्सवाच्या निमित्ताने होणारे महाप्रसादाचे आयोजन गर्दी टाळण्यासाठी बंद करण्यात आले आहेत. परिसरातील मढी, मोहटा देवी देवस्थान, भगवानगड, तारकेश्वर गडावर रोजच भंडारा चालू होता. श्री. क्षेत्र अमरापूरला पौर्णिमा व विविध उत्सव प्रसंगी, तसेच आव्हाण्याच्या गणपती देवस्थानात चतुर्थीच्या निमित्ताने होणारे महाप्रसाद बंद आहेत .
तरीही काही गडाद्वारे जेवणाचे पॅकबंद डबे पंचक्रोशीत गरजूंच्या घरापर्यंत पोहचत आहेत. तर, श्री. रेणुका देवस्थान व गणपती देवस्थानाच्या वतीने किराणा, मास्क सॅनीटायझर आदि साहित्य करण्यात येत आहे. स्वयंसेवी संस्थामध्ये या भागातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांचे कार्य कुठेही प्रसिध्दीच्या झोतात न येता अहोरात्र चालू आहे. तालुक्यात गावोगावी त्यांच्या शाखा आहेत ‘ जिथे कमी तिथे आम्ही ‘ अशी त्यांची भूमिका आहे.
रोजच्या जिवनावश्यक किराण्यासह आवश्यक साहित्य खात्री करून हजारो गरीबांच्या घरात सर्वांच्या अगोदर पोहच झाले आहे. दहीगावन्याच्या बागायती पट्ट्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांनी पूर्वभागातील कोरडवाहू भागात मोफत भाजीपाला पुरवला आहे. तर बोधेगांवच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच्याच घरी गरजूंच्या जेवणाची सोय केली आहे.
मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांनीही किराणा सहित्याच्या कीट गरजूंच्या घरोघरी पोहोच केल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते फुलचंद रोकडे व अरुण पाटील लांडे यांच्या मित्रमंडळानेही पाचशे कुटुंबांना किराणा साहित्याचे किट घरपोच केले आहे. शेवगावातील इन्सानियत ग्रुपच्या वतीने काही दिवस ड्युटीवरील पोलिसांना नाश्ता, दवाखान्यातील रुग्णांना व रस्त्यावरील भिकाऱ्यांना डबे देण्यात आले आहेत.
जगदंबा महिला ग्राहक सहकारी संस्थेच्या लक्ष्मी बाळकृष्ण विघ्ने यांनी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या हमालांना, बँक व वीज वितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांना साबण रुमाल, सॅनिटायझर व ‘मास्क’चे वाटप केले आहे. गंगामाई खाजगी साखर कारखान्याने दहा क्विंटल गहू चार क्विंटल तांदूळ दोन क्विंटल साखर दिली आहे. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब लवांडे यांनी हे साहित्य घरोघरी पोहच करण्याची व्यवस्था केली.
केदारेश्वरनेही कै.सुमनताई ढाकणे प्रतिष्ठानच्या वतीने गरजूंच्या जेवणासाठी ७५ हजार रुपयांची मदत दिली आहे. युवक राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी आव्हाणे परिसरात हातावर पोट असणाऱ्या २०० कुंटूबाना किराणा साहित्याचे वाटप केले. भाजपाचे कचरू चोथे मित्र मंडळाने, सभापती क्षितीज घुले युवा मंच व राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनीही नियोजनपूर्वक गरजूंना रेशन पोहच केले आहे. तर सध्या येथील विविध यंत्रणेत घरापासून दूर चाकरीवर असणाऱ्याना मोफत तर कांहींना अल्पदरात जेवणाचे डबे पुरविण्याची जबाबदारी येथील प्रदीप मुसवत हे पार पाडत आहेत.
मदतकार्याच्या महायज्ञात आपली ही आहूती असावी म्हणून येथील किराणा व्यावसायिकांनीही मोफत वितरणासाठी जाणाऱ्या किराणा साहित्याच्या भावात विशेष सूट देवून योगदान दिले आहे. अनेकदा कर्मचारीही दात्याची भूमिका पार पाडतात. तपासणी मोहिमेवर असतांना नायब तहसीलदार मयूर बेरड व गुप्त वार्ता विभागाचे राजू चव्हाण यांनी स्थलांतरीतांना पदरमोड करून प्रथम जेवणाची सोय केली आहे.
शेवगाव नगरपरिषदेची निवडणूक जवळ आल्याने विद्यमान नगरसेवक ही या कार्यात आपापल्या प्रभागात चमकू लागले आहेत. तर काही ठिकाणी इच्छुक उमेदवारही मदत कार्यात आघाडीवर आहेत. मदत करणाऱ्या हातांचे प्रमाण गरजूंच्या हातापेक्षा कित्येक पटीने अधिक आहे त्यामुळे येथे देणाऱ्याचे हात हजारो ,दुबळी माझी झोळी अशी अवस्था झाली आहे.
सर्वसामान्य गरीबाच्या घरात सध्या किराणा साहित्याची रेलचेल आहे. राज्य सरकार अंत्योदय व प्राधान्य लाभार्थी रेशन कार्डधारकांना तीन रुपये किलो गहू व दोन रुपये किलो दराने तांदूळ देत आहे. तर, केंद्र सरकारकडून त्या सर्वांना प्रत्येकी पाच किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. विविध निराधार योजनांच्या लाभार्थींना दरमहा मिळणारे मानधन सहाशे रुपयावरून हजार रुपये झाले आहे .दिव्यांगानाही याच प्रमाणात अर्थसहाय्य मिळते आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के निधी दिव्यांगावर खर्च करण्याचे बंधन आहे. आतापर्यंत तो नियम काटेकोरपणे पाळला जात नसे, आणि दिव्यांगांचेही त्याकडे लक्ष नव्हते . आता मात्र तोही निधी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या हद्दीतील दिव्यांगांना शोधून घरपोच दिला जात असल्याने रोजच प्रत्येक गावच्या दिव्यांगांना मदत दिल्याच्या बातम्या आहेत .