नवी दिल्ली – भारतात येत्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात आशियाइ मुष्टियुद्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. करोनाच्या धोक्यामुळे मार्च महिन्यापासून आयपीएलसह अनेक स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा होणार असल्याने पुन्हा एकदा स्पर्धात्मक खेळाचे वातावरण देशात तयार होईल, असा विश्वास भारतीय मुष्टियुद्ध महासंघाचे (बीएफआय) कार्यकारी संचालक आर. के. संचेती यांनी व्यक्त केला आहे.
यापूर्वी भारतात 1980 साली मुंबईत पुरुष गटाच्या तर, 2003 साली हिसारमध्ये महिला गटाच्या स्पर्धा झाल्या होत्या. आशियाई स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क भारताला फेब्रुवारी महिन्यातच मिळाले होते. त्यानुसार येत्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात या स्पर्धेचे आयोजन होणार आहे. स्पर्धेला अद्याप सहा महिन्यांपेक्षाही जास्त कालावधी असल्याने जगभर निर्माण झालेला करोनाच्या धोक्यावर नियंत्रण मिळालेले असेल अशी महासंघाची अपेक्षा आहे.