हेमंत महाजन
ज्यांना शक्य आहे अशा प्रत्येक भारतीयाने देशाच्या सीमावर्ती भागात पर्यटन करून तिथल्या जनतेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याकरता मदत करावी, याशिवाय या भागाला भेटी देऊन भारतीय सैनिकांचेसुद्धा मनोबल वाढवावे.
चिनी व्हायरसचा प्रभाव कमी झाल्यावर भारत सरकारने लडाखमध्ये टुरिझम पर्यटन सुरू करायला परवानगी दिली आणि त्यानंतर या भागात पर्यटकांची गर्दी होत आहे. या भागात बांधल्या गेलेल्या रस्त्यामुळे लडाख आणि कारगिलमध्ये आपल्याला दोन दिशांनी रस्त्याने काश्मीर आणि हिमाचल प्रदेशच्या बाजूने येता येते. श्रीनगरच्या बाजूने श्रीनगर, झोजीला, द्रास, कारगिल या मार्गाने व हिमाचल प्रदेशच्या बाजूने खरदुंगला खिंड, मनाली या रस्त्यावरून येता येते. अटल बोगदा बांधल्यानंतर मनाली रस्त्यावर आता पठाणकोटवरून केवळ आठ तासांमध्ये लेहमध्ये पोहोचता येते. याशिवाय विमानाने आपल्याला भारतातल्या मोठ्या शहरांमधून लेह विमानतळावर दोन तासांत उतरता येते.
रणनीतीदृष्ट्या महत्त्वाच्या लडाख भागात भारतीय लष्कराची मजबूत उपस्थिती आहे. लडाख आणि कारगिलमधल्या पर्यटनाचे अनेक पैलू आहेत. एक म्हणजे युद्धभूमी पर्यटन. यामध्ये द्रास, कारगिल जिथे कारगिलचे 1999 चे युद्ध झाले होते अशी ठिकाणी बघता येतात. याशिवाय 1962 मध्ये चुशुलच्या भागात झालेली लढाई, तिथेसुद्धा जाता येते. याशिवाय 1947-48 साली ज्या सैनिकांनी लडाखला पाकिस्तानमध्ये जाण्यापासून वाचवले त्यांचे युद्धस्मारक आपल्याला बघता येते. याशिवाय 2019 मध्ये चीनबरोबर गलवानमध्ये झालेली लढाई आणि दक्षिण व उत्तर भागामध्ये झालेल्या हातापाईच्या जागासुद्धा अगदी जवळून बघता येतात.
द्रास वॉर मेमोरियल
“तुमच्या उद्या करता आम्ही आमचे आज दिले- भारतीय सैन्य.’ द्रासच्या वॉर मेमोरियलच्या गेटवर लिहिलेल्या या ओळी वाचून सगळेच निःशब्द होतात. भारतवासीयांच्या सुरक्षिततेसाठी सैन्याने केलेले बलिदान, ज्यांची गाथा शब्दांत मांडणं खरचं कठीण आहे, असाच अनुभव या मेमोरियलमध्ये पाय ठेवल्यावर येतो. गेटमधून आत आल्यावर, समोरच दिसते, ती तोलोलिंग टेकडी आणि मग कारगिल युद्धाच्या सगळ्या आठवणी पुन्हा ताज्या होतात.
1999 सालच्या कारगिल युद्धात धारातीर्थी पडलेल्या आपल्या जवानांच्या स्मरणार्थ सैन्याने टायगर हिलच्या पायथ्याशी हे स्मारक उभारले आहे. इथून तोलोलिंग, टायगर हिल, पॉइंट 4875 बात्रा टॉप युद्धभूमीचा भाग असणारी शिखरं दिसतात. युद्धात वापरलेली शस्त्रास्त्रे, कॅप्टन मनोज पांडे गॅलरी, कारगिल युद्धाची गाथा सांगणारी फिल्म पाहायला मिळते. लडाख प्रदेशातील कारगिल दुसऱ्या क्रमांकाचं शहर आहे. सुरू नदीच्या काठावर वसलेला हा जिल्हा, लेह श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग-1 वर महत्त्वाचे ठिकाण आहे. इथल्या स्थानिकांनी पर्यटन वाढण्यासाठी छान प्रयत्न केलेले आहेत. दरवर्षी हजारो पर्यटक कारगिलला भेट देतात.
लेहवरून कारगिलला जाताना…
लेहवरून कारगिलला जाताना बरीच ठिकाणं पाहता येतात. लेहपासून 25 किमीवर पत्थर साहिब गुरुद्वारा आहे. सैन्याकरता हे पूजनीय ठिकाण आहे. पुढे सिंधू आणि झस्कार नद्यांचा संगम असलेले सुंदर स्थान आहे. मॅग्नेटिक हिल हे याच रस्त्यावर आहे. या स्पॉटला गाड्या बंद केल्यावरसुद्धा चुंबकीय प्रभावामुळे चढावर चढतात. प्रत्येक जण हा प्रयोग करून पाहायला इथे थांबतो. लामायुरू गावाजवळ काही टेकड्यांवर मूनलॅंड सारखी जमीन पाहायला मिळते. अलची गोंपा आणि लामायुरू गोंपा हे सगळ्यात जुने गोंपासुद्धा बघण्यालायक आहेत.
नैसर्गिक सौंदर्य, ऍडव्हेंचर टुरिझम लेह हे लडाखमधील सर्वात मोठे शहर आणि लडाखची राजधानी आहे. या प्रदेशातील मुख्य धार्मिक गट मुख्यत: शिया-46 टक्के, बौद्ध 40टक्के, हिंदू 12 टक्के तर शीख 2 टक्के आहेत.
लडाख हे भारतातील सर्वात उंच पठार आहे आणि त्यातील बहुतेक भाग 3 हजार मीटर (9 हजार 800 फूट) पेक्षा जास्त आहे. पाण्याचे मुख्य स्रोत म्हणजे डोंगरावर हिवाळ्यातील हिमवर्षाव. युद्धभूमी पर्यटनाशिवाय येथे नैसर्गिक सौंदर्य खास आहे. अनेक गुंफा, उंच शिखरे, देखणी खोरी, नदीकिनारे, वाळवंटी भाग, सपाट प्रदेश अशा अनेक भागांना भेटी देता येतात. अनेक प्रकारचे ऍडव्हेंचर टुरिझमसुद्धा करता येते.
बर्फाच्छादित टेकड्यांच्या मध्यभागी लडाख हे तिबेटी बौद्ध संस्कृतीचे केंद्र आहे. लडाखमधील काही लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये नुब्रा व्हॅली सारख्या अनेक खोऱ्यांचा समावेश आहे. येथे तिबेट मृग, आयबॅक्स आणि याक यासह दुर्मिळ वन्यजीव आहेत.
लडाख ज्याला “लॅंड्स ऑफ पासेस’ म्हणून ओळखले जाते, येथे ट्रेक ट्रेल्स आणि ट्रेकिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. लडाखमध्ये ट्रेकिंगबरोबरच बाइक चालविणे, वॉटर राफ्टिंग, सफारी यासारख्या साहसी खेळांमध्येही भाग घेऊ शकतो.
लडाखचे आकर्षण पॅंगॉंग लेक
लडाखच्या मुख्य आकर्षणांपैकी एक, जगातील सर्वाधिक उंचीवरील खाऱ्या पाण्याचे सरोवर पॅंगॉंग लेक 14 हजार फुटांवर आहे. पॅंगॉंग लेकचा 60 टक्के भाग चीनमध्ये तर 40 टक्के भाग भारतात आहे. प्रत्यक्ष सीमारेषेचा भाग या लेकमधून जाते.
भारतीय लाखो रुपये खर्च करून युरोपच्या बर्फाळ भागाला भेट देतात. परंतु त्याहून जास्त सुंदर ठिकाणे अत्यंत कमी खर्चात आपल्याला कारगिल आणि लेहमध्ये बघता येतात. लडाखसारख्या अती थंड, अती दुर्गम भागांमध्ये पर्यटनाशिवाय फारसे व्यवसाय उपलब्ध नाहीत. पर्यटन वाढल्यास या भागांमधल्या जनतेला विविध व्यवसाय उपलब्ध होतात. या शिवाय आपण चीन आणि पाकिस्तनलासुद्धा एक महत्त्वाचा संदेश देत आहोत की, भारत-चीन सीमेवर मोठ्या संख्येने भारतीय येत आहेत. परंतु चीनच्या बाजूला चिनी सैनिकांच्या शिवाय इतर कोणीही दिसत नाही. म्हणून सीमेवरील पर्यटनाच्या बाबतीत चीन वरती आपण नक्कीच कुरघोडी केलेली आहे.
यामुळे आपले सैनिक अशा कठीण भागामध्ये कसे लढतात हेसुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये देशभक्तीची भावना निर्माण होते. अशाच प्रकारचे युद्धभूमी पर्यटन हे अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधल्या भारत-चीन सीमेवरतीसुद्धा सुरू करावे, असे भारतीय सैन्याला आणि सरकारला सांगावेसे वाटते.