प्रा. किशोर सस्ते
आषाढ संपून श्रावण सुरू झाला की, चाहुल लागते ती श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदलेल्या हिरव्या गार मनमोहक धराराणीची आणि रिमझिम पाऊस धारांची. हा सगळा उत्साह आपल्याकडे श्रावणात असतोच परंतु उत्तर भारतामध्ये आषाढ अमावस्येलाच या हिरव्यागार निसर्ग आगमनाचे आदरातिथ्य “हरियाली अमावस्ये’ने केले जाते त्याला विशेष महत्त्व आहे.
हरियाली अमावस्या आपल्याकडे “दीप अमावस्या’ म्हणून साजरी करतात. वातावरणातल्या हिरवळीमुळे या अमावस्येला “हरियाली अमावस्या’ म्हणतात. या दिवशी वृक्षारोपण करण्याची प्राचीन परंपरा आहे. संपूर्ण विश्व जेथे पर्यावरण वाचवण्यासाठी “झाडे लावा, झाडे जगवा’ अशी चळवळ जागवत असताना, आपल्या ऋषीमुनींनी खूप आधीच झाडे लावण्याचा संदेश देऊन पर्यावरण संरक्षणाला धर्माबरोबर जोडले आहे.
हिरवळीची अमावस्या ही पर्यावरण संरक्षणाला आणि निसर्गाला समर्पित केलेली आहे. ज्याप्रमाणे आपल्याकडे “वटपौर्णिमा’ असते तशीच उत्तरेकडील राज्यांमध्ये “पिंपळ अमावस्या’ साजरी करतात. या दिवशी पिंपळ वृक्षांचे बुंध्याभोवती दोरा गुंडाळून पूजन केले जाते. विविध झाडांचे वृक्षारोपण केले तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात, या श्रद्धेबरोबरच त्याला पर्यावरणीय महत्त्वही आहे.
धनप्राप्तीसाठी तुळस, आवळा, केळी आणि बेल; वड, अशोक अर्जुन आणि नारळ सौभाग्य आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी; संततीप्राप्तीसाठी पिंपळ, नागकेशर, कडुनिंब, गुळवेल आणि अश्वगंधा; पारिजातक, रातराणी, मोगरा आणि गुलाब आनंदासाठी; सुखप्राप्तीसाठी कडुनिंब, पळस आणि कदंब आणि भरपूर सावली देणाऱ्या वृक्षांचं पूजन आणि रोपण केलं जातं. बुद्धीप्राप्तीसाठी शंखपुष्पी, ब्राह्मी, पळस आणि तुळशी यांचं रोपण करण्यात येतं. या दिवशी शमी, आंबा, जांभुळ, आवळा, खैर, काटेसावर, नागचाफा, वेळू बांबू व इतर नक्षत्र वृक्षांची देखील लागवड केली जाते. या दिवशी नदीतील माशांना आणि मुंग्यांना अन्न देण्याची परंपरा आहे.
आपल्याकडे श्रावणातल्या शुक्रवारी जसे जिवती देवीची पूजा करून जिवतीच्या म्हणजेच टेलोस्मा पॅलिडाच्या हिरव्या फुलांची भाजी करून नैवेद्य दाखवतात; याप्रमाणेच नेमाड प्रांतात या दिवशी देवी जिरोती देवीचे भित्तीचित्र दरवाजाच्या दोन्ही बाजूला काढले जाते व पूजा केली जाते. अशी चित्र आदिमानव पूर्वी गुहेमध्ये काढत आणि जसजशी प्रगती होत गेली तसे आदिमानव गावांमध्ये वसले गेले आणि या भित्तीचित्रांवर रंगरंगोटी केली जाऊ लागली. ही अमावस्या मुलांच्या आरोग्य आणि परिवाराच्या सुखसमृद्धीसाठी साजरी केली जाते. ही समृद्धी हरित पर्यावरणामुळे मिळते. ही चित्रकला परंपरा, संस्कृती आणि हिरव्यागार निसर्गाचं प्रतीक आहे.
यादिवशी “हाली अमावस्या’ म्हणजेच आषाढी बैलपोळा साजरा केला जातो. हल म्हणजे नांगर. सर्व शेतीला हिरव्यागार करणाऱ्या नांगर आणि पाभारीचे पूजन केले जाते. म्हणून “हलहारिणी अमावस्या’देखील म्हणतात. जिकडे-तिकडे हिरव्या रंगाने बहरलेल्या सृष्टीचा आनंद साजरा करण्यासाठी यात्रा आणि उत्सव भरवले जातात. केरळ राज्यामध्ये द्रोणपुष्पीची फुले म्हणजेच थुंबा फुलाने पूजा करून या दिवशी पूर्वजांना तिळतर्पण केले जाते.
विशेष म्हणजे उत्तर भारतात या दिवशी जिरोतीच्या चित्रांमध्ये पूजा केल्या जाणाऱ्या नाग आणि विंचू यांच्या दंशावर ही थुंबा वनस्पती उपयुक्त आहे. हरियाली तीज हा सण हिरवळीच्या अमावस्या नंतर तिसऱ्या दिवशी साजरा केला जातो, हाच सण आपल्याकडे भाद्रपद महिन्यातील तिसऱ्या दिवशी साजरा करतात. धार्मिक श्रद्धेच्या अर्थाबरोबरच निसर्गातील हिरवळीमुळेच कदाचित हरतालिका असे नाव दिले गेले असावे.
या महिन्यात बुध ग्रहाचे पूजन केले जाते. कारण तो हिरव्या रंगाचा स्वामी आहे. देवी-देवतांची नावं निसर्गातील हिरव्या रंगावर आधारित आहेत. आपला समाज हा पर्यावरण संरक्षणाचे प्रतीकच आहे. म्हणूनच आपण पर्यावरण संरक्षणाचा वसा हाती घेतला पाहिजे. या सगळ्या हिरव्या पर्यावरणाच्या अधिवासाचा देव वनमाळी म्हणजेच श्रीहरीचे नावसुद्धा हिरवा रंग दर्शविते. या दिवशी उत्तर भारतामधील श्रीकृष्ण मंदिरात आणि वृंदावनातही हरियाली अमावस्या उत्सहाने साजरी केली जाते.
उन्हाचा दाह कमी करण्यासाठी विश्वप्रसिद्ध फुल बंगल्यात चैत्र-वैशाखात सुरू केलेला रंगीबेरंगी फुलांचा उत्सव हिरवळीच्या अमावस्येला संपतो. देवाला हिरव्या रंगाच्या वस्तूंची आरास केली जाते. हिरव्या भाज्या, फळं, हिरव्या रंगाचे वस्त्र, झाडांच्या पानांचा हिंदोळा, हिरवा पोशाख आणि पन्ना या रत्नाच्या हिरव्या माळा घातल्या जातात. पिस्त्याचे लाडू नैवेद्यासाठी केले जातात आणि हिरव्या रंगाची विद्युतरोषणाई केली जाते.
हा भारतीय सण सरत्या आषाढाला निरोप देताना श्रावणात येणाऱ्या हिरवळीचं स्वागत आणि सदाहरित पर्यावरणासाठी अमावस्येला दीप लावून केलेलं हे औक्षणच नाही का? चला तर मग आपल्याकडे देखील या मंगलमय अमावस्येला जैवविविधता जतनाचा आणि पर्यावरण संरक्षणाचा वसा हाती घेऊया.