दुय्यम निबंधक गैरहजर, व्यवहार थंडावले
लोणी काळभोर – करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. सरकारला वार्षिक हजारो कोटी रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या निष्काळजी व हलगर्जीपणामुळे कदमवाकवस्ती व मगरपट्टा येथील विभागाच्या कार्यालयात संबंधित दुय्यम निबंधक अधिकारी उपस्थित नसल्याने सरकारचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. दस्त नोंदणी ठप्प झाली आहे.
पुणे जिल्ह्यात 13 तालुके, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यासाठी एकुण 48 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. त्यातील 27 कार्यालये संपूर्ण हवेली तालुका, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या क्षेत्रासाठी आहेत. उर्वरित 12 तालुक्यांसाठी 21 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत. म्हणजेच हवेली तालुका वगळता इतर 12 तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात जेवढा महसूल राज्य सरकारला मिळतो. त्यापेक्षा जास्त महसूल हवेली तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातून राज्य सरकारला मिळतो.
संपूर्ण राज्यात शुक्रवारी (दि. 5) दुपारी 4 वाजेपर्यंत 9001 दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याद्वारे राज्य सरकारला आजच्या एका दिवसात 74 कोटी 52 लाख रुपये महसूल मिळाला आहे. मागील एका महिन्यात 380 कोटी 47 लाख रुपये महसूल नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्य सरकारच्या तिजोरीत जमा केला आहे.
चालू आर्थिक वर्षातील गेल्या दहा महिन्यात संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 17 लाख 43 हजार 252 दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे. या द्वारे राज्य सरकारच्या तिजोरीत 11 हजार 886 कोटी रुपयांची भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षातील दहा महिन्यांपैकी सात आठ महिने करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये गेली आहेत. करोना कालावधीत सर्व व्यवहार ठप्प झाल्यावर ही तब्बल 12 हजार कोटी रुपये शासनाला दुय्यम निबंधक कार्यालयातून मिळाले आहेत. करोना नसता तर साधारण 40 हजार कोटी रुपये महसूल शासनाला मिळाला असता असे तज्ञांचे मत आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर दुय्यम निबंधक कार्यालये सुरु झाल्यावर थोडे दिवस सोशल डिस्टन्स पाळला गेला. त्यानंतर मात्र दुय्यम निबंधक कार्यालयात प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. मात्र या गर्दीला हाताळण्यासाठी किंवा नियंत्रीत करण्यासाठी कसलीही उपाययोजना आखण्यात आलेली नाही. संबंधित आधिकारी आपले टेबल सोडून बाहेरच येत नसल्याने त्यांना हे कळतच नाही कि आलेल्या ग्राहकांना किती त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयातील दुय्यम निबंधक कुठलीही जबाबदारी स्वीकारत नाहीत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दस्त नोंदणीला सर्व्हरचे ग्रहण
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग संगणकीकृत केल्याची टिमकी महसूल मंत्र्यांपासून सर्वचजण वाजवतात. मात्र या विभागाचे पोर्टल व सर्व्हर कायमच डाऊन असतो. सर्व्हर डाऊन असल्यामुळे ग्राहकांच्या पाच मिनिटांच्या कामाला अख्खा दिवस लागतो. कधी कधी तर एक संपूर्ण दिवस थांबूनही सर्व्हर डाऊन असल्यामुळे काम होत नाही. आपापले उद्योग, व्यवसाय व नोकरी सोडून ग्राहकांना दुय्यम निबंधक कार्यालयात फेरे मारावे लागतात.
नागरिक दारात, अधिकारी घरात
कदमवाकवस्ती येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील आधिकारी रजेवर गेल्यामुळे त्याच्या हाताखालील व्यक्तीला प्रभारी चार्ज देऊन गेले काही दिवस कारभार सुरु होता. परंतु तेथील अधिकारी गेले दोन महिने कार्यालयात आलेला नाही. त्यामुळे नागरिक कार्यालयाच्या दारात व अधिकारी घरात अशी अवस्था नागरिकांची झाली आहे. एखादा अधिकारी कामावर येत नसेल तर संपूर्ण कार्यालयाचा कारभार बंद ठेवण्यासारखा तुघलकी कारभार गेले दोन महिने कदमवाकवस्ती दुय्यम निबंधक कार्यालयात सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.