गणेश आंग्रे
पुणे – राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने नवीन बांधकाम प्रकल्पांमधील सदनिका अथवा दुकाने यांच्या दस्तनोंदणीसाठी “ई-रजिस्ट्रेशन’ संगणक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. राज्यातील सुमारे ३३७ गृहप्रकल्पांमध्ये ई-रजिस्ट्रेशन प्रणालीचा वापर सुरू असून मागील तीन वर्षांत राज्यात ई-रजिस्ट्रेशन सुविधेद्वारे सुमारे 11 हजार 338 दस्तांची नोंदणी झाली आहे. या सुविधेमुळे बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयातून ऑनलाइन प्रणालीद्वारे दस्त नोंदणी करता येत असून नागरिकांच्या वेळेत बचत होत आहे.
नागरिकांना ऑनलाइन सुविधा देण्यात नोंदणी व मुद्रांक विभाग अग्रेसर आहे. मागील काही वर्षांपासून नोंदणी विभागाने संगणक प्रणालीचा वापर करून अधिकाधिक सुविधा नागरिकांना घरबसल्या कशा मिळतील, यावर भर दिला जात आहे. नवीन गृहप्रकल्पात सदनिका अथवा दुकान खरेदी केल्यानंतर व्यवहार नोंदविण्यासाठी सध्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. पण नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ई-रजिस्ट्रेशनची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
परंतु ती फक्त मोठ्या म्हणजे ५० पेक्षा अधिक सदनिका असलेल्या बांधकाम प्रकल्पांसाठीच होती. त्यानंतर त्यामध्ये बदल करून वीसपेक्षा अधिक सदनिका असलेल्या बांधकाम प्रकल्पासही ती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ही अट सुध्दा हटविण्यात आली आहे.
ज्या विकासकांकडे रेरा रजिस्ट्रेशन आहे. अशा विकासकाना ई-रजिस्ट्रेशन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जेणेकरून विकसकांना स्वत:च्या प्रकल्पातील सदनिका खरेदी-व्रिकीचे दस्त या सुविधोच्या माध्यमातून कार्यालयातूनच अपलोड करता येतील. ते मंजूर झाल्यानंतर त्यांच्या कार्यालयातच रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करता येईल. राज्यात पाचशेपेक्षा अधिक दुय्यम निंबधक कार्यालये आहेत.
राज्यात महिन्याला विविध प्रकारचे सरासरी दोन लाख दस्त नोंदविले जातात. मागील काही वर्षांपासून सदनिका खरेदीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नवीन बांधकाम प्रकल्पांना या सुविधेचा फायदा होत आहे. मागील तीन वर्षात राज्यात ११ हजार ३३८ सदनिकांची प्रथम विक्री या प्रणालीद्वारे नोंदविण्यात आली आहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे 100 पेक्षा जास्त गृहप्रककल्पांमध्ये या सुविधेचा वापर सुरु आहे. भविष्यात नवीन बांधकाम प्रकल्पातील सदनिकांचे दस्त ई-रजिस्ट्रेशनद्वारे नोंदविण्याचे ध्येय असल्याचे नोंदणी विभागाकडून सांगण्यात आले.
ई-रजिस्ट्रेशनची वैशिष्ट्ये
- ही सुविधा फक्त नवीन सदनिकांसाठीच (फर्स्ट सेल) आहे.
- सदनिका अथवा दुकाने यांची विक्री करार ई-रजिस्ट्रेशनद्वारे करणे शक्य
- दुय्यम निबंधक कार्यालयातील गर्दी कमी होण्यास मदत
- रांगा लाऊन ताटकळत उभे राहण्यापासून नागरिकांची सुटका
- नागरिकांच्या वेळेची बचत
“ई-रजिस्ट्रेशन या सुविधेचा विकसकांना आणि नागरिकांना फायदा होत आहे. या सुविधेमुळे मुख्यत्वे दस्त नोंदणी कार्यालयात होणारी गर्दी कमी होत आहे. तसेच नागरिकांच्या सोयीच्या वेळेनुसार दस्त नोंदविता येत आहे.” -अभिषेक देशमुख, नोंदणी उपमहानिरीक्षक, नोंदणी व मुद्रांक विभाग