Manoj Jarange – मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. जरांगे यांचा हा ४ दिवसीय दौरा असून या दौऱ्यात ते गोदापट्ट्यातील ११ तालुक्यातल्या १२३ गावांना भेटी देणार आहेत. तसेच जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील या गावांना भेटी देऊन मुंबई आंदोलनाबाबत मार्गदर्शन देखील करणार असल्याची माहिती आहे.
या दौऱ्यापूर्वी बोलतांना जरांगे म्हणाले की, आजपासून या दौऱ्याला सुरवात होत असून, या दौऱ्यात सभा होणार नाहीत. मुंबईला जाण्याशिवाय आता पर्याय नाही. आज कॅबिनेटची बैठक झाली. त्यातही सरकारने काही ठोस निर्णय घेतला नाही. मराठा समाजाच्या ५४ लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत.
त्यामुळे सरकारने मराठ्यांचा आंदोलन गांभीर्याने घेतले पाहिजे. मराठा आणि कुणबी एकच आहेत. तुम्ही २० जानेवारीची वाट बघू नका, त्यानंतर तुमची आमची चर्चा बंद होणार असल्याचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
भुजबळांना स्वार्थाचे वेड लागल
यावेळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. तुला जर ओबीसीचे वेड लागले असते, तर धनगर बांधवांच्या आरक्षणावरती स्पष्ट भूमिका घेतली असती. तुला केसेस मागे घेण्याचे, राजकारणात मोठ-मोठे पद घ्यायचे वेड लागलेले आहे. तुला फक्त स्वतःच्या स्वार्थाचे वेड लागलंय, अशी टीका जरांगे यांनी केली आहे.